दादा, हे संपादक.

कार्यकर्ता म्हणाला. दादा दूरध्वनीवर बोलत होते. त्यांनी संपादकांना हातानेच समोरच्या खुर्चीवर बसण्याची खूण केली. संपादक बसले. दादांचा दूरध्वनी सुरुच होता. टेबलवर पडलेले प्रचाराचे पत्रक हाती घेऊन संपादक ते चाळू लागले.
जरा वेळाने दूरध्वनी खाली ठेवत दादांनी संपादकांना नमस्कार केला.
संपादकांनीही केला.

मग दादा म्हणाले, बोला.
संपादक म्हणाले, विशेष काही नाही. तुम्ही निवडणुकीला उभे राहिलात. म्हटलं, जाऊन भेटू या.
दादा म्हणाले, तुम्ही आलात ते चांगलं केलं... पण आपली मदत पाहिजे बरं का या वेळेला.
संपादक म्हणाले, ती तर आहेच.

मग संपादक राजकीय सद्यस्थितीवर बरेच बोलले.
ढासळती नीतीमूल्ये, समाजहितैषू वृत्तीचा लोप, सौदेबाज राजकारणी, राजकारणाचे गुन्हेगारीकरण, प्रसारमाध्यमांची ढासळती विश्वासार्हता यावरही ते बरेच बोलले.

मग म्हणाले, तुमच्या बातम्या-फोटो व्यवस्थित छापतोय आम्ही.
दादांनी आपल्या कार्यकर्त्याकडे पाहिले. तो म्हणाला, चांगलं कव्हरेज देतात हे आपल्याला.
दादा प्रसन्नसे हसले.
मग त्यांनी विचारले, कोणता पेपर म्हणालात तुमचा?
कार्यकर्ता म्हणाला, दादा, मोठा पेपर आहे त्यांचा. भरपूर खपतो.
दादा म्हणाले, खप चांगला आहे म्हणता तुमचा. पण त्यातला खरा किती आणि स्किमचा किती?
संपादक म्हणाले, राज्यातला नंबर एकचा विश्वासार्ह आणि निःपक्षपाती पेपर आहे आमचा.
निःपक्षपाती असेल, तर मग आमच्या काय हो उपयोगाचा?
दादांनी ज्योक केला. संपादक कसनुसे हसले. ते पाहून दादाही समजून हसले.

संपादक म्हणाले, या निवडणुकीत आम्ही एक स्कीम आखलीय. आम्ही तुमच्या बातम्या, लेख, फोटो हे सगळं छापणार.
दादा म्हणाले, वा वा. छापा की. काय पाहिजे ते मटेरियल आम्ही देऊ.
संपादक म्हणाले, नाही. मटेरियलचा प्रश्न नाही. त्यासाठी आमचे बातमीदार आहेतच.
दादा म्हणाले, तुमचा कोण तो बातमीदार. परवाच भेटून गेला. म्हटला, मुलाखत छापतो. दोन हजार अंक घ्यावे लागतील.
संपादक म्हणाले, तेच सांगतोय मी. आम्ही एक स्कीम आखलीय. म्हणजे तुमची नुसती मुलाखत नाही छापायची. तुमच्याबद्दलचे लेख छापायचे. फोटो छापायचे. तुमचा गुणगौरव करणा-या कविता, मान्यवरांच्या मुलाखती.. अशी एक पुरवणीच काढायची.
दादा म्हणाले, पण त्याचा काय उपयोग. ह्ल्ली लोक खूप हुशार झालेत. त्यांना बरोबर माहित असतं, की हे सगळं पैसे देऊन छापलेलं असतं.
संपादक म्हणाले, तेच तर सांगतोय मी. आमचा पेपर हा अत्यंत विश्वासार्ह आणि निःपक्षपाती असल्यामुळे लोकांना ती शंकाच येणार नाही. त्यांना वाटेल, आम्हीच स्वतःहून छापलंय ते.

दादा म्हणाले, पण याचा रेट काय?
संपादकांना रेट म्हणताच लाजल्यासारखे वाटले. पण ते लाजले नाहीत.
ते म्हणाले, आता तुमच्याशी काय बोलायचं साहेब. तुम्हीच द्या समजून झालं.
दादा म्हणाले, नाही नाही. तसं नको. तुम्ही भाव सांगा.
संपादक म्हणाले, आता तुमच्याशी काय भाव करायचा साहेब. पण शेवटी आम्हांलाही मालक आहे. एवढी मोठी संस्था आमची. एवढं जुनं साम्राज्य. त्यात आता पसाराही वाढवून ठेवलाय. हे सर्व चालवायचं म्हणजे पैसे पाहिजेतच ना.... पाच लाखांची पुरवणी छापू तुमची.
दादा म्हणाले, पाच म्हणजे खूपच जास्त होतात. तुमचा तो दुसरा पेपर... काय नाव त्याचं.... तो लाखभरात चार पानं छापतो म्हणाला.
संपादक एकदम सावध झाले.
ते म्हणाले, हॅ. तो काय पेपर आहे? तो काय विश्वासार्ह आहे का निःपक्ष?... चला, चारमध्ये करून टाकू या.
दादांनी कार्यकर्त्याकडे पाहिले. कार्यकर्त्याने संपादकांकडे पाहिले. संपादकांनी दादांकडे पाहिले.
मग बराच काळ त्यांची घासाघीस सुरु राहिली.

सौदा कितीवर झाला ते काही समजले नाही.

समजले एवढेच,
की येत्या एक-दोन दिवसांत दादांची स्पेशल सप्लिमेन्ट विश्वासार्ह व निःपक्ष पेपरबरोबर येणार आहे.

(Posted by चांगदेव पाटील, २६ सप्टें. २००९)


वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्य यांस सविनय निवेदन -
गत काही महिने आम्ही एका वेगळ्या उद्योगात मग्न होतो. खरे तर उद्योग हाच, लेखनाचा होता, परंतु वेगळ्या माध्यमासाठी आम्ही लिहित होतो व ते माध्यम म्हणजे दूरचित्रवाणी हे होय.
होय, दूरचित्रवाणीवरील मी मराठी या वाहिनीवरील एका मालिकेसाठी आम्ही लेखन करीत होतो.
त्या मालिकेचे नाव, नावात काय आहे? असे असून, ती मालिका दर शुक्रवारी रात्री साडे नवाच्या ठोक्यास प्रक्षेपित होणार आहे. उद्या, शुक्रवार दिनांक चार सप्टेंबर रोजी त्या मालिकेचा पहिला भाग दाखविणार आहेत.
तरी आपण सहपरिवार, इष्ट मित्रमैत्रिणींसह ही मालिका पाहून तिच्यावर टीका आणि टिपण्णी करण्याची कृपा करावी, ही विनंती.


मालिकेचे लेखन संपले, की मग बातमीदारवर तुम्ही आहात आणि आम्ही आहोतच.
अनेक दिवसांची कसर भरून काढायची आहे. अनेक विषय मस्तकी आहेत.
त्यांचा सविस्तर समाचार घेऊच.

मध्यंतरी आमच्या कानी अशी चर्चा येत होती, की
बापूंना एका वृत्तपत्राच्या म्यानेजमेन्टने दम भरल्याने बापू भयग्रस्त झाले व म्हणून त्यांनी ब्लॉगलेखन थांबविले. तर तसे काही नाही. कारण -
१. आम्ही ज्या प्रकारचे लिखाण करतो, त्यास मराठीमध्ये मोठी परंपरा असून, त्या परंपरेचा पाईक होण्याची पात्रता आमच्या अंगी यावी असा आमचा नेहमीच प्रयत्न असतो.
२. आम्ही बातमीदारवर जे लिहितो ते कोणाच्याही विरोधात नसते, तसेच येथे कोणाचीही बदनामी करावी असा उद्देश नसतो व हे समजून घेण्याची शक्ती पत्रकार व पत्रमालक व पत्रव्यवस्थापक आदीकरोनी सर्वांस असावी, असा आमचा अजून तरी समज आहे.
असो.

आमच्या या निवेदनाने सर्व अफवा, वावड्या, बोलवा व चर्चांस पूर्णविराम मिळेल, अशी आमची खात्री आहे.
आपण बातमीदारवर जे प्रेम करीत आहात, ते असेच कायम राहो, हीच कामना.
(हे फार इमोशनल होतंय का? होऊ दे.)

- आपला नम्र,
बापू
(दि. ३ सप्टेंबर २००९)