"सद्यकालीन सामाजिक परिस्थितीचा एकसमयावच्छेदेकरून विचार करता पत्रकारिता अधिक जबाबदार होण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे. वृत्तपत्रांच्या व विशेषतः दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी या जाणीवेने काम केले पाहिजे, की आपल्या पत्रकारितेने सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय वातावरण प्रदुषित होणार नाही. या जबाबदारीचे भान त्यांनी न बाळगल्यास भावी पिढ्या त्यांस कदापि माफ करणार नाहीत. निदान कविवर्य मंगेश पाडगावकर तर त्यांस कधीही क्षमा करणार नाहीत...."
समग्र तंद्री लावून, एकेक शब्द प्रचंड विचारपूर्वक मेळवित, अतिशय गांभीर्याने आमचे लेखनकर्म सुरु होते आणि अचानक, "बाय गो, काय झॅक लिहताय वो तुम्ही बापूराव!" असे कौतुकमयी उद्गार आमच्या कानी पडले.
ही अर्थातच आमची ही.
"काय पल्लेदार लिहिलंय हो तुम्ही! आणि विचारही किती टोकदार! जणू काही अग्रलेखच. अहो, मटा, नाहीतर लोकसत्तेकडंच हा लेख पाठवा तुम्ही. केवढी खळबळ उडेल..." ही भल्तीच खुश झाली होती आमच्या लेखनावर. क्षणभर वाटले, की आता ही आमचे दोन्ही गाल चिमटीत धरून आम्हांस गुगलीवुगलीमुशच करणार! (पण नाही केले... वयपरत्वे चेहरा रखरखीत झालाय. पॉंड्स वापरायला हवे!)
"पण बापूराव, मंगेश पाडगावकरांचं काय मधेच काढलं हे?" तिने विचारले.
तिला असा प्रश्न पडणे साहजिकच होते. वाचन कमी पडते ना! पक्की उपसंपादक शोभते या बाबतीत ती! आमचे मात्र तसे नाही. आम्ही पत्रकार असल्याने आमचा प्रचंड व्यासंग आहे. खूप वाचतो आम्ही. म्हणजे लोकसत्ता, मटा, पुढारी, लोकमत आणि सकाळ! तिने सकाळ तारीख तीन व चार फेब्रुवारी वीसशेदहा, वर्ष सोळावे, अंक सात व आठ वाचला असता, तर तिच्या लक्षात आले असते, की रा. रा. पाडगावकारांचे हे प्रकरण नेमके काय आहे ते.
मुळात या प्रकरणाचे मूळ आहे ते दूरचित्रवाणी वाहिन्यांमध्ये.
खरे तर त्याचे मूळ आहे पाडगावकरांमध्ये.
गेल्या आठवड्यात ते बालकुमार साहित्य संमेलनासाठी संगमनेरला गेले होते. तेथे सहजच बोलता बोलता त्यांनी पद्मपुरस्कारांचा विषय काढला. ते म्हणाले, की मला (पक्षी : पाडगावकरांना) खूप पुरस्कार मिळाले, पण पद्म पुरस्कार नाही मिळाला. ते (पक्षी : पद्म) पुरस्कार कोणाला कसे मिळतात हे मला माहित आहे.
पाडगावकर हे जे काही म्हणाले, त्याचा आमच्या दूरचित्रवाणीच्या पत्रकारांनी केला पराचा कावळा. त्यांनी एकदम बूम मचालेच केले व दिल्या ब्रेकिंग न्यूजा, की पाडगावकरांनी पद्मपुरस्कार न मिळाल्याबद्दल व्यक्त केली खंत.
झाले. दिवसभर या बातम्या चालल्या. त्याने मराठी साहित्यविश्वाच्या इवल्याशा कोपात मोठे वादळ उठले.
मग दिवस संपला. बातम्या संपल्या. वादळही शमले. झाले.
म्हणजे नेहमीप्रमाणेच झाले.
आता हे सर्व आमच्या हिला कसे माहित असणार. कारण की ती ना आना इस देसमे लाडो व नंतर उतरनमध्ये व्यस्त होती. वृत्तवाहिन्याही मनोरंजक असतात हे तिला कुठले कळायला!
पण आम्ही ते सर्व मनःपूर्वक पाहिले होते. ते पाहून आम्हांस एवढेच जाणवले, की वाहिन्यांनी रा. रा. मंगूआजोबांच्या बोलगाण्याचे नाहक रडगाणे केले. त्या बातम्या पाहून कोणासही वाटावे, की जणू काही मंगूअण्णा मला पद्म हवे म्हणून हातपाय झाडत रडत आहेत. वस्तुतः ती सर्व बूमशाकालाकाबूम जादू होती. तीच ही जादू, जी आज शाहरुखखानास भोवते आहे. जी शशी थरूरांस भोवली होती.
आता दूरचित्रवाणीच्या नियमांनुसार एवढ्यावरच हे प्रकरण संपणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही. त्याचेही एक मोठे सुरस उपकथानक आहे, जे सुरु होते सकाळच्या पानांवरून.
त्याचे असे झाले,
की मंगूअण्णांचे, हे (पक्षी : पद्म) पुरस्कार कसे मिळतात हे मला माहित आहे, या विधानाने कोणास ठाऊक कसा पण अनेकांचा इज्जत पापड मोडला. आमचे पवारांच्या शिवारातले राजकवी व रानकवी रा. रा. ना. धों. महानोर यांना तर या विधानाने बुब्बुळे जळली, जळले चंद्र माझे अशीच काही स्थिती आली. उग्र रागेजले ते. त्या भरात त्यांनी तरातरा वावरात जाऊन रागातल्या कविता लिहायला घेतल्या. पण मग सकाळचे मुख्यसंपादक व साहित्य संमेलनाचे माजी स्वागताध्यक्ष रा. रा. उत्तमराव कांबळे त्यांस म्हणाले, की आमच्या येथे आम्ही फक्त विडंबन कविताच प्रसिद्ध करतो. तेव्हा मग कविराजांनी अखेर एक लेख लिहिला व तो सकाळपत्री धाडून दिला.
वाचकहो, काय बरे होते या लेखात?
या लेखाचे शीर्षक होते - लाचावले मन, लागलीसे गोडी
या लेखात महानोरांनी पाडगावकरांवर असूडच ओढले आहेत. त्यांच्या म्हणण्याचा एकतृतीयांश सारांश असा (कंसातील विधाने आम्हां पामरांची) :
पद्मपुरस्कार मिळालेले लोक किती लायक आहेत, हे मला माहित आहे अशी खदखद पाडगावकरांनी व्यक्त केली. (आम्हांस वाटले, या वाक्यावर रा. रा. सैफअली खान प्रतिक्रिया देईल. परंतु ते तर पद्मपुरस्कारप्राप्त महानोरांना लागले! असे का बरे झाले? प्रश्नच आहे.) लोकांनी पाडगावकरांना पद्मपुरस्कार मिळावा म्हणून म्हटलं, तर ते आनंददायी आहे. पण आपणच आपली वखवखलेली भूक अशा पद्धतीने मांडणं हे आपणच आपल्याला खाली आणण्यासारखं, अहंकारी आहे. सामान्य माणसंसुद्धा आज बोलताना शहाणपण ठेवून बोलतात. (मंगूअण्णा, समझदार को इशारा काफी है!) पाडगावकर बोलले ते औचित्याला धरून खासच नाही. हे मला फोन करणा-यांचं, चॅनल्स आणि पेपर्सचं म्हणणं आहे. मला सांगतात, तुम्ही यावर लिहायला हवं बुवा! (ठीक आहे. त्या पेपरांत एक सकाळ आहे हे समजलं. बाकीचे कोण?) साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळवतानासुद्धा पाडगावकरांनी लाचावलेपण (पक्षी : हावरटपणा) केले. इतरांच्या निवडून आलेल्या अध्यक्षपदाला जोगवा व भीक म्हणावी याच्याइतकी घसरण कुणाची मी पाहिली नाही. महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर पाडगावकर सर्वत्र फिरत राहिले. ऐकायला येत नसलं, तरी मुलाखतकार बोलतात आणि हे तिसरंच सांगताहेत हेही हास्यास्पद रसिकांनी पाहिलं. (हा पाडगावकरांच्या बहिरेपणाचा उल्लेख किती बरे औचित्यपूर्ण!)पुन्हा यात रा. रा. महानोरांनी, पाडगावकर खूप पैसे मागतात, अतिरिक्त सोयी आणि व्यवस्था (व्यवस्था या शब्दाला कोट घालून त्यातून दुसराच अर्थ निघेल याची योग्य व्यवस्था कविराजांनी केलेली आहे. कविराज, तुम्हांसही पत्रकारितेतील युक्त्या जमतात बरे का!) मागतात, हे आयोजक रसिकांना पेलवत नाही हो, असाही सूर लावलेला आहे, तोही किती बरे औचित्यपूर्ण म्हणावा!!
तर हा एकूणच किती बरे औचित्यपूर्ण लेख मराठी वाङ्मयाच्या इतिहासात शेतक-याचा असूड अर्थात कविराजाचा सूड म्हणून ओळखला जाईल, याबाबत आम्हांस मुळीच शंका नाही! हा लेख पहिल्या पानी अचानक प्रसिद्ध करून सकाळकारांनी मोठीच वाङ्मयसेवा केलेली आहे. कौतिकराव ठाले-पाटील यांनी याची योग्य ती कदर करावी, ही नम्र विनंती. (सांगायची बात म्हणजे, सकाळमध्ये गार्सीयाचा पुनर्जन्म झालेला आहे. त्या गार्सीयाच्याच काय, पण कोणाच्याही लेऔटानुसार लेखात इंट्रोबिंट्रो असावा लागतो. परंतु महानोरांच्या या लेखाला तसा कोणताही आगापीछा नव्हता. शेंडाबुडखा नव्हता. (पाहा). तो असा अधांतरीच अँकरला होता. हे एक नवलच म्हणावयाचे! फार घाईत निर्णय झाला होता काय त्याचा सकाळवाले?)
हे संपूर्ण महाकाव्य आम्ही आमच्या हिला सांगितले. किंतु व्यासंगाअभावी तिला ते समजलेच नाही. ती विचारती झालीच, की पाडगावकर बोलले. महानोरांनी लिहिले. सकाळने छापले. पण मग बापूराव, तुम्ही का म्हणून कातावले?
आत्ता यावर आम्ही काय कपाळ बोलणार?
या सगळ्या प्रकरणावर दस्तुरखुद्द पाडगावकरसुद्धा काही बोलले नाहीत.
सकाळच्या प्रतिनिधीने त्यांना खुलासा विचारला, तर ते म्हणाले, की मी निरुत्तर झालो आहे.
बरोबरच आहे.
प्रसारमाध्यमे टीआरपी, खप, याही पलीकडे वैयक्तिक रागलोभ, हितसंबंध, गटबाजी या प्रेरणांनीही व अनेकदा या प्रेरणांनीच कार्यरत असतात, हे जोवर त्यांना उमगणार नाही, तोवर पाडगावकरांना या प्रश्नाचं उत्तर देताच येणार नाही.
(Posted by बापू आत्रंगे, दि. ५ फेब्रुवारी २०१०)


