आजचा मुंबै सकाळ व चित्रमय टुडे वाचलात का?
हो. सकाळीच.

आणि त्यातील टुडेच्या वर्धापनदिनाची बातमी?
ती 'सकाळ'मध्ये हशा-टाळ्यांचा झिम्मडझिम्मा या शीर्षकाची बातमी ना? वाचली की.

मग काय वाटले?
काय वाटणार? सकाळमधील एक पुरवणी तब्बल तीन वर्षे सुरु राहिली, याबद्दल आनंदच वाटला! शिवाय बातमीचा मथळाही आवडला आम्हांला. मराठी पेपरांची ही परंपराच आहे बरे का. दरवर्षी एकदा तरी असा मथळा येतोच छापून. बहुधा त्याचा परमनंट ब्लॉक करून ठेवलेला असावा. कदाचित बातमीच्या इंट्रोचाही ब्लॉक तयार असेल. पावसाळ्यातला कार्यक्रमासाठी हा इंट्रोचा ब्लॉक. तोच कार्यक्रम उन्हाळ्यात झाला, की हा इंट्रोचा ब्लॉक. चांगले आहे. यातून डोक्याची केवढी बचत होते!

आणि त्या वर्धापनदिन सोहळ्याबद्दल काहीच नाही वाटले?
व्वा! वाचून मजा वाटली की. जितेंद्र जोशी यांच्या कविता आणि कोट्या, नकलाकार श्रीनिवास लखपती यांच्या नकला, असा छानच नकली कार्यक्रम आयोजित केला होता सकाळकारांनी. ही नवी परंपरा सुरु केलेली दिसतेय सकाळने. लावण्या, नकला, ऑर्केस्ट्रा, त्याचे पांचट सूत्रसंचालन... अत्यंत उंची मनोरंजन! अखेर म्हणतात ना, उंचे लोग उंची पसंद!!...

ते जाऊ द्या हो. तुम्ही ती बातमी आणि कार्यक्रमाची चित्रझलक नीट पाहिलेली दिसत नाही...
का? काय झाले?

अहो, त्या बातमीने तिकडे मंत्रालयात मोठी खळबळ माजली आहे. सगळे सनदी अधिकारी तर चक्रावूनच गेलेत...
काय म्हणता काय?... अहो, पण मनिषाताई म्हैसकरांची छायाचित्रे छापून आली म्हणून काही एवढी खळबळ माजायला नको. लोकांचे पण कसे असते ना? तिकडे दिल्लीत एवढे रामायण झाले, त्याने नाही खळबळ माजली आणि...

दिल्लीत? काय झाले काय?
तुम्हांला माहित नाही? काही महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राचे गणेश रामदासी माहिताहेत ना? ते हो, माहिती उपसंचालक. तर मनिषाबाईंनी त्यांची बदली केली होती. तिकडं नाशिकला...

म्हणजे लोकसत्ताच्या संजय आवटेंची झाली होती तशीच?
हो तशीच. आता अशी चर्चा आहे, की ती बदली अत्यंत 'अभिनंदनी'य व 'थोरा'-मोठ्यांनी केलेली होती. तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना भेटून चावाच काढला म्हणा ना गणेशभाईंचा! आता गणेशभाई म्हणजे षटकार क्लबचे आधारस्तंभ. तो असा तसा कसा क्लिन बोल्ड होईल? त्यांनीसुद्धा मग फिल्डिंग लावली. जोरात सामना झाला तो. जणू लोकमान्य लोकशक्ती विरोधी महाराष्ट्र टाइम्स यांच्यातील ट्वेंटी-ट्वेंटीच. अखेर हा सामना रामदासींनीच जिंकला आणि त्यांची बदली रद्द झाली. मनिषाताईंनी केलेली बदली नव्या मुख्यमंत्र्यांनी रद्द केली. म्हणजे अशी चर्चा आहे. खरं काय ते तपासून पाहिले पाहिजे...

हो पण, सकाळमधील बातमी याहून खळबळजनक आहे. मनिषा म्हैसकर यांच्याकडचे माहिती महासंचालकपद गेले म्हणतात... तुम्ही टुडेतली चित्रझलक नाही वाचलीत? तिथे फोटो कॅप्शनमध्ये, देवेंद्र भुजबळ हे राज्याचे माहिती महासंचालक असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. विशेष म्हणजे बातमीत मात्र त्यांचे पद उपसंचालक असे दिले आहे. म्हणजे नक्कीच काही तरी मोठा घोळ असणार!
खिखिखिखि. तुम्ही पण काय राव पराचा कावळा करताय! अहो तो मुद्राराक्षसाचा विनोद आहे...

नाही हो. तसे असणे शक्य नाही. कारण की सकाळच्या मुद्रितशोधन विभागाचे जे प्रमुख आहेत ना, त्यांच्याच हस्ते भुजबळसाहेबांचा सत्कार होतानाचा तो फोटो आहे. त्याची कॅप्शन कशी चुकेल? शिवाय सगळीकडे मनिषाताईंचा उल्लेख केवळ लोकराज्यच्या संपादिका असाच आलेला आहे.
नाही नाही. सकाळमध्ये काहीही होऊ शकते. तुम्ही उगाच अर्थाचा अनर्थ करू नका. पराचा कावळा करू नका. छोटीशी चूक आहे ती.

पण मग मनिषाताई म्हणाल्या त्यात तर काही चूक नाही ना?
काय म्हणाल्या त्या?

वाचत जा हो बातम्या नीट. उगाच संपादकांसारखे करताय! त्यांना बिचा-यांना वेळ नसतो पेपर वाचायला. पण तुम्हांला काय उद्योग असतो हो?
नाही, ते मनिषाताई काय म्हणाल्या ते सांगताय ना?

त्यांनी सकाळवर टीका केली की सकाळची प्रशंसा याबद्दल मतभेद आहेत. पण त्या म्हणाल्या, की सकाळ हे ट्रेनिंग सेंटर आहे. आणि येथूनच त्यांना त्यांच्या लोकराज्यसाठी प्रशिक्षित कर्मचारी मिळाले.
असे म्हणाल्या त्या?

छापून आलेय तसे सकाळमध्येच. वाचत जा हो तुम्ही...
मनिषाताई या ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत. आणि सनदी अधिकारी म्हटले, की तो बोलतो एक आणि त्याचा अर्थ असतो दुसराच. कोणत्याही मंत्र्याला विचारा हे! तेव्हा नक्कीच मनिषाताईंच्या या विधानात दोन अर्थ दडलेले असणार.

यातला पहिला अर्थ कोणता?
सकाळ हे ट्रेनिंग सेंटर आहे, याचा अर्थ येथून बाहेर पडणारे पत्रकार हे सुप्रशिक्षित असतात. चांगले असतात.

आणि दुसरा अर्थ?
सकाळमधून पत्रकार नेहमीच बाहेर पडतात! टिकत नाहीत...

टिकत नाहीत असे कसे म्हणता तुम्ही? अनेक पत्रकार दशकानुदशके आहेतच की सकाळमध्ये.
तो सकाळचा नाईलाज आहे!

च्यामारी असा अर्थ आहे काय बाईंच्या बोलण्याचा. एकूणच वर्धापनदिनाच्या कार्यक्रमापेक्षा ही कार्यक्रमाची बातमी म्हणजे हशा-टाळ्यांचा झिम्मडझिम्मा आहे! व्वा व्वा!

सकाळच्या टुडे पुरवणीला आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!

(Posted by चांगदेव पाटील, दि. २२ जून २००९)

जमल्यास हेही वाचा -
टुडेच्या कुशीत टुमारो आला त्या सोहळ्याचा वृत्तांत (बातमीदार)
हॅपी बर्थडेची गोष्ट (बेस्ट ऑफ भंकस)

कोणत्या वृत्तपत्राने कोणत्या विषयावर कधी व कसा अग्रलेख लिहावा, हे सांगणारे आपण कोण?
अखेर अग्रलेख हा संपादकांचा विशेषाधिकार आहे. आणि तो तसा असला पाहिजे. परंतु अंकातील जाहिरातीप्रमाणेच अलीकडे बातम्यांवरही संपादकांचे फारसे नियंत्रण नसते. अनेक दडपणे, अनेक नाईलाज, अनेक गणिते असतात. संपादक ही संस्था हतबल असते. अंकातील ही अशी ९९ टक्के जागा मालक, मुद्रक, प्रकाशक, जाहिरातदार आणि वाचक यांच्या नियंत्रणाखाली आणि उरलेला अग्रलेखाचा टक्का तेवढा संपादकाचा, अशीच एक सर्वसाधारण विभागणी ठरून गेलेली आहे. वस्तुतः हा टक्काही पूर्णांशाने संपादकाचा नसतो. मालक कधीही त्यास विचारू शकतो, की संपादक, कोण म्हणतो तुम्हांला टक्का दिला?

अशा परिस्थितीत आपल्यासारख्या वाचकांनीही एडिटरबुवांना अग्रलेखाचा विषय डिक्टेट करणे हा म्हणजे संपादक या संस्थेवरील अन्यायच झाला. पण तरीही कधीकधी वाटते, की या या विषयावर अग्रलेख छापून यावा. म्हणजे त्या विषयावर त्या दैनिकाचे मत काय आहे, धोरण काय आहे हे आपणांस समजेल व आपल्या ज्ञानात काही भर पडून लोकशिक्षणाचे पवित्र कार्य केल्याचे समाधान संपादकास मिळेल. याच भावनेतून पद्मसिंह पाटील अटकप्रकरणी संपादकीय मतप्रदर्शन व्हावे असे आम्हांस वाटत होते. कारण अखेर हा प्रश्न राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाशी निगडित आहे. माजी गृहमंत्र्याला व आजी खासदाराला खूनप्रकरणी अटक होणे, अण्णा हजारे यांच्यासारख्या सामाजिक नेत्याच्या हत्येचे कटकारस्थान रचले जाणे हा आम्हांस अग्रलेखाचा विषय वाटत होता. अजूनही वाटत आहे. आमचे वाटणे अगदीच गैर नव्हते, हे अटकेनंतर लगेचच महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, पुढारी यांसारख्या दैनिकांनी या विषयावर अग्रलेख लिहिला यावरून स्पष्ट झाले.

पद्मसिंह पाटील हे ज्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला कालपर्यंत आदरणीय होते, त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घरातले वृत्तपत्र म्हणजे सकाळ. (सकाळ या वृत्तपत्राचा शरद पवार वा राष्ट्रवादी कॉंग्रेसशी काहीही संबंध नाही, असे जे सांगितले जाते, ते खरेच असल्याचा आमचा समज आहे, हे आम्ही येथे नम्रपणे नमूद करू इच्छितो. तेवढे बावळट आम्ही नक्कीच आहोत.) तेव्हा सकाळचे या प्रकरणी काय म्हणणे आहे, हे जाणून घेण्यास आम्ही खूप उत्सुक होतो. अशीच उत्सुकता आम्हांस लोकमान्य लोकशक्ती काय म्हणते याविषयीही आहे. आज ना उद्या या विषयास लोकसत्ताकार हात घालतीलच. आणि नाहीच घातला, तर आणखी पन्नासेक वर्षांनी त्याचा त्रिकालवेध घेतील. असो.

तर अखेर पद्मसिंह प्रकरणावरील अग्रलेखाची सकाळ आज, १२ जूनला जेष्ठातल्या चतुर्थीच्या मुहूर्तावर उजाडली. 'पद्मसिंहांचे निलंबन' असे या अग्रलेखाचे शीर्षक आहे. शीर्षकावर जाऊ नका. मथळा बातमीसारखा असला, तरी मजकूर अग्रलेखासारखाच आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने पद्मसिंह यांना निलंबित केल्यानंतर, 'उशीरा सुचलेले शहाणपण' अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली होती. सकाळच्या या अग्रलेखाबाबत तसे म्हणता येणार नाही. अगदी योग्यवेळीच अग्रलेखाचा निर्णय झालेला आहे. पद्मसिंह आता पक्षात नाहीत, त्यांना गचांडी देण्यात आलेली आहे, पक्षाने नैतिकतेच्या मुद्दयाची गुढी उभारून हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे. तेव्हा तीच गुढी आता नाचविण्यास कोणाचीच हरकत असण्याचे कारण नाही. एकदम योग्यवेळीच सकाळने अग्रलेख लिहिण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसशी सकाळचा कोणताही संबंध नसल्याचे आपण वर पाहिलेच आहे. त्यामुळे या अग्रलेखात सकाळकारांनी राष्ट्रवादीवर अत्यंत कडक शब्दात टीकाही केलेली आहे. उदाहरणार्थ - "विविध राजकीय पक्ष वेळोवेळी स्वपक्षीयांवर आरोप झाल्यानंतर कायदा त्याचे काम करील. तोपर्यंत आम्ही संबंधिताला निर्दोषच मानतो, अशी भूमिका घेताना दिसतात. अर्थातच सर्वच पक्षांनी राजकीय नैतिकतेचे धडे नव्हे, तर मुळाक्षरेच गिरविण्याची वेळ पुन्हा एकदा आली आहे, असे हे प्रकरण सांगते," असे सकाळकारांनी लिहिले आहे. हे वाक्य म्हणजे खासकरून शरद पवार यांच्यावर टाकण्यात आलेला शाब्दिक हातगोळाच आहे. सकाळने येथे जे धाडस दाखविले त्याबद्दल सकाळकारांचे खास अभिनंदन.

या अग्रलेखाबद्दल आमचा एकच आक्षेप आहे. तो म्हणजे - "सीबीआयने ताब्यात घेतल्याबरोबर त्यांनी (पक्षी - पद्मसिंह यांनी) तातडीने पक्षाचा त्याग केला असता आणि आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला असता, तर त्यांची नैतिकता शाबूत आहे, असेही म्हणता आले असते (म्हणजे पद्मसिंहांनी आधी राजीनामा दिला असता, तर सकाळने त्यांना खरोखरच नैतिकता शाबूत असल्याचे सर्टिफिकेट दिले असते की काय? बापरे!) आणि पक्षालाही नामुष्कीला सामोरे जावे लागले नसते..." ".... निर्णयाला जो उशीर झाला त्यामुळे पक्षाच्या प्रतिमेचे निश्चितच नुकसान झाले आहे..." हे जे सकाळकारांनी आज म्हटले आहे, ते जरा आधीच म्हटले असते, तर राष्ट्रवादीचा केवढा तरी फायदा झाला असता. नामुष्की टळली असती, प्रतिमेचे नुकसान टळले असते, राजकारणातील नैतिकता शाबूत राहिली असती, शाबित झाली असती व सकाळकारांच्या दूरदृष्टीचे व निर्भिडतेचे पवाडे युगानुयुगे गायिले गेले असते. असो.

या अग्रलेखातून सकाळकारांनी राजकारण आणि नैतिकता यांतील द्वैत संपविण्याची आवश्यकताही प्रतिपादन केली आहे. "राजकारण आणि नैतिकता यांतील विरोधाभास संपेल तेव्हाच असे (पक्षी - हत्या, सुपारी आदी) प्रकार थांबतील," असे सोल्युशनही सकाळकारांनी येथे दिले आहे. हा विरोधाभास संपेल तेव्हा संपेल, परंतु "तोपर्यंत जनतेनेच अशा घटनांच्या संदर्भातील जागरूकता दाखवून विवेक केला पाहिजे," असे सकाळकारांनी सुचविले आहे. ही छानच व अत्यंत व्यवहार्य व नैतिक अशी सूचना आहे, असे आमचे स्पष्ट मत आहे. फक्त 'जनतेने अशा घटनांच्या संदर्भातील जागरूकता दाखवून विवेक करायचा', म्हणजे नेमके काय करायचे हे एकदा सकाळकारांनी सांगावे म्हणजे झाले!

(Posted by चांगदेव पाटील, दि. १२ जून २००९)

एकेकाळी ज्याने राज्याचे गृहमंत्रीपद सांभाळले (येथे भूषविले असा शब्द सूचत होता. पण तो आम्ही जाणीवपूर्वक टाळला.) त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला आदरणीय असलेल्या खासदार पद्मसिंह पाटील यांना खूनप्रकरणात अटक झाली. महाराष्ट्राची मान शरमेने खाली जावी, अशी ही बाब आहे. या घटनेचे पडसाद राज्याच्या राजकारणात पुढील अनेक वर्षे उमटत राहतील. असो. आम्हांस येथे या विषयावरील अग्रलेख लिहायचा नाही. आपली वृत्तपत्रे आपापल्या वृत्तपत्रीय धोरणानुसार यावर अग्रलेख लिहितीलच. आपण ते वाचूच.

पण येतील या विषयावर अग्रलेख?
येतील.
सकाळकारांना थोरली कसरत करावी लागेल एवढेच.
पद्मसिंह पाटील प्रकरण हे सकाळसाठी जरा अवघड जागचे दुखणे आहे, असे म्हणावयास हरकत नाही.
पण म्हणून अन्य कोणी सकाळकडे बोट दाखविण्याचे कारण नाही. कारण मग तशी बोटं सगळ्यांवरच उठू शकतील. दुसरी गोष्ट म्हणजे अलीकडे अवघड विषयांना अनुल्लेखाने टांग मारायचा शिरस्ता बहुतेक सर्वच वृत्तपत्रांनी घेतलेला दिसतो आहे. आठवा - आनंद यादव प्रकरण, किंवा अगदी ताजाफडफडीत शिवस्मारक वाद.

पण याबाबतीत पत्रकारांनाही फार नावे ठेवून उपयोग नाही. वृत्तपत्रे हा कॉर्पोरेट बिझनेस झाल्याचा हा परिणाम आहे.
पण सगळ्याच पत्रकारांनी, संपादकांनी आपली शस्त्रं पगाराच्या स्लीपमध्ये अगदीच गुंडाळून ठेवलेली नाहीत!
उदाहरणार्थ निखिल वागळे.

आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी सोमवारी रात्री आजचा सवाल या त्यांच्या हिट (हिटचा एक अर्थ तडाखा असाही आहे बरे!) कार्यक्रमात राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा मुद्दा चर्चेला घेतला होता. या मुद्दयावर निखिल वागळे यांनी त्यांचे इंटरॉगेटिव्ह जर्नालिझमचे कसब पणाला लावून राष्ट्रवादीच नव्हे, तर सर्वच पक्षांची भंबेरी उडविली. यावेळी मुद्दा पद्मसिंहाच्या अटकेचा होता. त्यामुळे निखिल वागळेंची तोफ साहजिकच शरद पवार यांच्यावर रोखलेली होती. या कार्यक्रमात ज्येष्ट पत्रकार हेमंत देसाई हेही सहभागी झाले होते. हेमंत देसाई तसे शांत प्रवृत्तीचे, मृदुभाषी पत्रकार आहेत. पण या मुद्दयावर त्यांनीही थेट शरद पवार यांच्यावर शरसंधान केले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाराष्ट्रातील राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले, पवारांनी गुन्हेगारांना राजाश्रय दिला, अशी सणसणीत टीका त्यांनी निर्भिडपणे केली. अजित पवार, उदयनराजे निंबाळकर, सुरेश कलमाडी आदींची तर नावे घेऊन त्यांनी टीका केली. या निर्भिडपणाबद्दल आणि प्रश्नाच्या मुद्देसूद मांडणीबद्दल निखिल वागळे आणि खासकरून हेमंत देसाई यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे.

झी २४ तास, स्टार माझा या वाहिन्यांनीही हे प्रकरण अशाच पद्धतीने लावून धरलेले आहे. ई-टीव्ही व साम मराठी आमच्याकडे दिसत नसल्याने त्यांचे आम्हांस माहित नाही. मात्र साम मराठीने गेल्या नागपूर अधिवेशनात लोकप्रतिनिधी कसे कायद्याच्या चिंधड्या उडवतात, यावर एक पॅकेज केले होते, ते आम्हांस या निमित्ताने स्मरते आहे. आमच्या आठवणीनुसार, विधिमंडळ परिसरात धुम्रपानबंदीचा कायदा मोडत असलेल्या एक-दोन आमदारांचे स्टिंग ऑपरेशन साम मराठीने केले होते व त्यावर नंतर मोठी चर्चाही घडवून आणली होती. धुम्रपानबंदीचा कायदा मोडण्याचा गुन्हा करणा-या आमदारांना धारेवर धरणारी ही वृत्तवाहिनी या खूनप्रकरणातही तेवढ्याच तडफेने वागेल, यात आम्हांस तरी काही शंका वाटत नाही!

पद्मसिंहांच्या अटकेनंतर उस्मानाबादेत आयबीएन-लोकमतच्या ओबी व्हॅनची मोडतोड करण्यात आली. पत्रकारांनी किमान या घटनेचा तरी निषेध करावयास हवा होता. पण निषेध तर दूरच, काही वृत्तपत्रांनी आपल्या बातमीत आयबीएन-लोकमतचा साधा उल्लेखही केला नाही. एका खासगी वृत्तवाहिनीच्या व्हॅनवर दगडफेक झाली म्हणे! अन्य वृत्तपत्राचे, वाहिनीचे नाव आपल्या पत्रात छापण्याची काय शरम वाटते वृत्तपत्रांना हे काही आम्हांस कळत नाही. संपादकाचे नाव छापायचे झाले, तर ज्येष्ठ पत्रकार असे छापतील! समजा उदाहरणार्थ महाराष्ट्र टाइम्सचे संपादक, लोकमतचे संपादक असे म्हटले, तर काय तुमच्या पेपरचा खप कमी होईल? पण... संकुचितपणा, दुसरे काय!! या आजाराला काही औषध नाही.

वृत्तपत्रांचे सोडून द्या. पण पत्रकारांच्या संघटना?
त्यांना पुरस्कार वितरण सोहळे करणे वगैरे खूप कामे असतात, हे आम्हांस मान्य आहे. परंतु तरीही पत्रकारांच्या संघटनांनी अशा घटनांच्या निषेधाची शाब्दिक कृती तरी वेळात वेळ काढून करावी, अशी आमची सविनय विनंती आहे.

इत्यलम्.

(Posted by चांगदेव पाटील, दि. ८ जून २००९)

(हा लेख आता रात्री साडेअकरा वाजता आम्ही लिहित आहोत. उद्या, मंगळवारच्या वृत्तपत्रांत पद्मसिंह प्रकरणावरचे अग्रलेख असतील. ज्या पत्रात नसेल, त्यास पद्म पुरस्कार द्यावा, अशी शिफारस बापूंनी केली आहे. तेव्हा कृपया अशा वृत्तपत्रांची नावे आम्हांस आवर्जून कळवा. - चां.पा.)

ब्रूस विलिसच्या डाय हार्ड या चित्रमालिकेतील चौथा भाग कुणी पाहिलाय? त्यात बघा एक कंप्युटर हॅकर मुलगा असतो. मुलगा म्हणजे खरे तर संगणकातला बाप असतो तो. सायबरपिढीचा अस्सल प्रतिनिधी. एका प्रसंगात तो ब्रूसबाबूंसमवेत कारमधून चाललेला असतो. काररेडिओवर गाणीबिणी वाजत असतात. मध्येच ब्रूसबाबू रेडिओची कळ फिरवित म्हणतात, बातम्या ऐकू यात. बातम्या म्हटल्यावर हा मुलगा आश्चर्यचकितच होतो. म्हणतो - तुम्ही बातम्या ऐकता? काही खरं असतं का त्यात? अहो, बातम्या म्हणजे अवघा बनाव असतो, कॉर्पोरेट कंपन्यांनी तयार केलेला! (आमच्या इंग्रजीच्या ज्ञानानुसार हा संवाद दिलेला आहे. चुकभूल द्यावी-घ्यावी.)

सोमवार दिनांक आठ जून दोन हजार नऊ रोजी आम्ही लोकसत्ता व सकाळ ही वृत्तपत्रे (आम्हांस उपलब्ध झाली म्हणून) वाचली आणि आम्हांस डाय हार्ड भाग चार मधील त्या प्रसंगाचे मर्म समजले. झाले असे, की सर्वप्रथम आम्ही सवयीने लोकसत्ता वाचला. त्यात पद्मसिंह पाटील यांच्या अटकेची बातमी होती. (ती वाचून आमचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास किंचित बळकट झाला.) लोकसत्ताने या प्रकरणाचे विविध पैलू विविध बातम्यांद्वारे स्पष्ट केले आहेत. उदाहरणार्थ 'डॉक्टरांच्या अटकेने राष्ट्रवादी कॉंग्रेसने धरले अंथरूण!' अशा छान मथळ्याची एक बातमीही लोकसत्ताने दिली आहे. (पान ५) मुंबई डेटलाईनच्या या बातमीत राष्ट्रवादीची पिसे काढतानाच सदरहू बातमीदाराने म्हटले आहे, की 'पद्मसिंह पाटील यांना सीबीआयने न्यायालयात हजर केले तेव्हा राष्ट्रवादीचा एकही नेता तेथे फिरकला नाही.' शरद पवार यांच्या यासंबंधातील वक्तव्यास दुजोरा देणारीच ही घटना होती. निंबाळकर खून प्रकरण ही 'वैयक्तिक घटना' आहे. त्यात राष्ट्रवादीचा काही संबंध नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता वाचून झाल्यानंतर आम्ही सकाळ वाचण्यास घेतला. त्यातही पद्मसिंह पाटील अटकेच्या विविध पैलूंचा विस्कळीत समाचार घेण्यात आला होता. त्यातील आतील पानावरील (पान ४) एक चौकट वाचून मात्र आम्ही चकितच झालो! कारण की त्यात म्हटले होते - न्यायालयाच्या आवारात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रीघ लागलेली होती. लोकसत्ता म्हणते, कोणीही फिरकले नाही. आणि सकाळवाले म्हणतात, रीघ लागली होती. कोण खरे?

एकंदर बातम्या वाचता, असे लक्षात येते, की लोकसत्ताच्या सदरहू बातमीदाराने वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून बातमी दिली. आपले मत वा निष्कर्ष यांना अनुरुप अशीच तथ्ये मांडायची, असा प्रकार सध्या पत्रकारितेत बोकाळलेला आहे. त्यातलाच हा प्रकार.

अशीच एक बातमी लोकसत्ता व सकाळने प्रसिद्ध केली आहे.(८ जून). बातमी आहे अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाविषयीची. सकाळच्या बातमीनुसार ऑनलाइन प्रवेशासाठी राज्य सरकारने सुरु केलेल्या संकेतस्थळाची चाचणी रविवारी घेण्यात आली व ती चाचणी यशस्वी झाली. ही चाचणी कशाची होती? सकाळच्या बातमीनुसार एकाचवेळी किती विद्यार्थी वेबसाईटला भेट देऊ शकतात हे तपासण्यासाठी चाचणी घेण्यात आली होती. ही चाचणी खरेच यशस्वी ठरली का? लोकसत्ताच्या बातमीचे शीर्षक आहे - ऑनलाइनच्या रंगीत तालमीमध्ये सर्व्हरने केला घात! झाला का गोंधळ? सकाळचा बातमीदार म्हणतो - चाचणी यशस्वी. लोकसत्ता बातमीदार म्हणतो - सर्व्हरने अवसानघात केला. कोण खरे?

एकंदर बातम्या वाचता, असे लक्षात येते, की केवळ एमकेसीएलच्या अधिका-याशी बोलून सकाळने सदरहू बातमी दिली आहे. त्यामुळे बातमीस साहजिकच सरकारी पत्रकाची कळा आली. लोकसत्ताच्या बातमीदाराने मात्र या बातमीवर अधिक मेहनत घेतलेली दिसते. त्यामुळेच या चाचणीदरम्यान सर्व काही सुरळीत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. ती बाब त्याने शालेय शिक्षणमंत्र्यांच्या कानावर घातल्यावर ते म्हणाले, की ऑनलाइन प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यासाठीच तर हा प्रयोग करण्यात आला.

या बातम्या वाचल्यानंतर कधीतरी वाचलेले एक इंग्रजी वाक्य उगाचच आठवले, की डोंट बिलिव्ह (पेपरातील बातम्यांसकट) एव्हरीथिंग यू रीड!!

(Posted by चांगदेव पाटील, दि. ८ जून २००९)