वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष आणि अन्य हो,
गेले वर्षभर आपण अधुनमधून येथे मस्त भंकस केली.
आपण म्हणण्याचे कारण म्हणजे, येथे आम्ही जे लिहित होतो, ते तुम्हां सर्वांचेच होते. ते तुमच्या मनातले होते. आम्ही फक्त ते शब्दबद्ध केले. विचार, भावना तुमच्याच होत्या, आम्ही त्यांचे फक्त शब्दांकन केले.
कुणास चिमुकचिमटे काढले, कुणाची टोपी उडविली.
कुणास शालजोडीतले दिले, तर कुणास शब्दशाल-श्रीफलही दिले.
तुम्हीही आम्हांस सोडले नाही.
आमच्यावरही तुम्ही टीका केली, कधी कवळेकौतुक केले.
एकंदर मझा आली.
या मजेमजेत आमच्याकडून कोणी दुखावले गेले असेल,
तर गड्यांनो, माफ करा!
आमचे लक्ष्य कधीही व्यक्ती हे नव्हते, हे समजून घ्या.

आता तुम्ही म्हणाल, की बापू असे निरोपाचे विडे का उचलतो आहे?
तर आता खरोखरच निरोपाची वेळ आलेली आहे.
(निरोपाचा क्षण फार वाईट असतो मित्रहो! पण कोणी, आता पीळ नका मारू, असे सांगण्यापूर्वीच कल्टी मारलेली बरी! कसें?)

तर या ब्लॉगवर पुन्हा नक्की भेटू या.
तोवर - टाटा, बायबाय, रामराम!!

आपला स्नेहांकित,
बापू आत्रंगे.

-----------------------------------------------

बापू आत्रंगे यांनी काही काळासाठी, वैयक्तिक कारणांमुळे बातमीदारची रजा घेतलेली आहे. मात्र हा ब्लॉग, तसेच सहयोगी बातमीदार व कळते-समजते हे ब्लॉग सुरुच राहणार आहेत. या तिन्ही ब्लॉग्जवरील आपले प्रेम असेच कायम असू द्या.

- ब्लॉग एडिटर, ए-सिडिक कम्युनिकेशन्स, मुंबई

बादशहाचे आज काहीतरी बिनसले आहे, हे चाणाक्ष बिरबलाच्या तत्काल ध्यानी आले.
त्याने चिंतेने विचारले, "खाविंद, तबियत नासाज दिसते आपली. रात्री पुरेशी निंद झाली नाही, की सकाळी उठल्यावर सामन्याचा अग्रलेख वाचलात?"
उजव्या हाताने कानशिल दाबत बादशहा म्हणाला, "बिरबल, अरे अग्रलेख परवडला... पण आमची बेगम! लाहोलविलाकुवत!!"
एवढ्या वर्षांचा अनुभव असल्याने बिरबलाच्या लगेच लक्षात आले, की राणीसाहेबांनी बादशहाकडे काही तरी हट्ट धरला आहे.
"काय झाले बेगमसाहिबांना?" त्याने पुन्हा काळजीने विचारले. बादशहा आणि साहेबांच्या कुटुंबाची नेहमी आस्थेने चौकशी करावयाची असते, हा कचेरीराज्यशास्त्राचा पाठ बिरबलाने कोळून प्यायलेला होता.
"कसे सांगू तुला?... त्या तुमच्या तंबी दुराई ऊर्फ श्रीकांत बोजेवारांना अक्षरशब्द पुरस्कार मिळाल्याच्या बातमीने पुरा घोटाळा केलाय! बेगमच्या भावालासुद्धा आता पुरस्काराचे डोहाळे लागलेत! त्यासाठी त्याला हास्यरंगचे कंत्राट द्या, म्हणून बेगम मागे लागल्यात..."
ते ऐकून बिरबल कोसळायचाच शिल्लक राहिला.
"कसे शक्य आहे? तुमच्या मेव्हण्याला थोडीतरी विनोदबुद्धी आहे का?"
बादशहा म्हणाला, "बेगम म्हणतात, है! आमचा मेव्हणा कधी कधी राजकीय-सामाजिक लेख लिहित असतो. हल्ली तर टीव्हीवर राजकीय विश्लेषक म्हणूनही बोलावतात लोक त्याला..."
"खाविंद, राज्यात राजकीय अभ्यासकांची, विश्लेषकांची मुळातच कमी आहे. त्यामुळे टीव्हीवाले लोक काय, वेळ भरून काढायला कोणालाही बोलावतात! निवडणुकांच्या वेळी तुम्ही ते पाहिलेच असेल. शिवाय मेव्हणेसाहेबांचा तर वशिलाही दांडगा आहे!... ते जाऊ द्यात. मुळात मेव्हणेसाहेबांचा आणि विनोदाचा संबंधच काय?" बिरबलाने पृच्छा केली.
"तेच तर म्हणतोय आम्ही. पण बेगमकडे गुप्तचरांचे अहवाल आहेत! त्यानुसार त्यांच्या भावाचे लेख वाचताना, त्यांचे टीव्हीवरील बोलणे ऐकताना लोक मनोमनी खदाखदा हसत असतात! म्हणजे ते केवढे विनोदी असणार बघा!" बादशहा म्हणाला.
"खाविंद, अहो, ते विनोदी वेगळे आणि हास्यरंगमधले विनोदी लेखन वेगळे!" बिरबलाला आता स्वतःचे मस्तक स्वतःच्या हातांनी फोडावे असे वाटू लागले होते.
"बिरबल, अरे आम्ही मालक असलो म्हणून काय झाले? आम्हांला पत्रकारितेतले थोडेफार तरी कळत असेलच की नाही? पण बेगम म्हणतात, की विनोदी लिहिणे म्हणजे काही फार मुश्किल काम नाही."
"जहापन्हां, हा तंबी दुराईंवर अन्याय होतोय!"
"अंहं. बेगम म्हणतात, तंबी दुराई असा कोणता तीर मारतात? आपण त्याला बिरबल-बादशहाच्या गोष्टींचे कॉपीराईट दिले. म्हणून तर तो विनोदी लेखक झाला. बेगम म्हणतात, आपण आता ते कॉपीराईट तिच्या बंधुला द्यायचे. म्हणजे झाले!!"
"खाविंद, अहो, विनोदी लिहायचे म्हणजे त्याच्यामागे मोठी तपश्चर्या असते. अतिशय गंभीर अभ्यास असतो. भाषेवर हुकूमत असावी लागते. विसंगती टिपायची निर्विष नजर असावी लागते. तंबी दुराई इतकी वर्षे विनोदी लिहिताहेत... हे काही ये-यागबाळ्याचे काम नाही! तसे मराठीत अनेक विनोदी अखबारनवीस आहेत... ब्लॉगमध्ये बापू आत्रंगेसारखे लोक आहेत... नाही असे नाही! पण खरे सांगू? त्यांचे पीजे वाचताना धाय मोकलून रडावेसे वाटते हो!... सगळ्यांनाच ब्रिटिश नंदी किंवा तंबी दुराई नाही होता येत खाविंद!!"
"अरे मग आता यावर उपाय काय? राणीसाहेबांची समजूत कशी काढायची? त्या तर हट्टालाच पेटल्यात." बादशहा दुखरी कानशिले दाबत म्हणाला.
"खाविंद, आहे... यावर उपाय आहे. तुम्ही बेगमसाहिबांना सांगा... म्हणावे, मेव्हणेसाहेबांसारख्या चतुरस्त्र प्रज्ञावंताने हास्यरंगसारख्या पुरवणीत अडकून पडावे हे काही खरे नाही! त्यापेक्षा त्यांना एखाद्या अखबाराच्या एखाद्या आवृत्तीचे संपादक करा! हल्ली अशा विनोदी संपादकांची मोठी लाट आहे. त्यात ही आणखी एक भर पडेल एवढेच."
"व्वा व्वा, बिरबल. काय अक्सीर इजाल सांगितलास! तुझ्या बुद्धीची आणि निरिक्षणशक्तीची कमाल आहे! या उपायाने सापही मरेल आणि लाठीही तुटणार नाही! व्वा!" असे म्हणत बादशहाने अतिप्रसन्न होऊन बिरबलास आपल्या हातातील अखबार दिला.

त्या अखबाराचे नाव काही आम्हांस समजले नाही.
त्यामुळे आमची मात्र वेगळीच पंचाईत झालीय.
हल्ली पेपर वाचताना आम्हांस पदोपदी बादशहाच्या मेव्हण्याची आठवण येते आणि अभावितपणे आमची नजर प्रेसलाईनकडे वळते!!

(Posted by बापू आत्रंगे, दि. २३ मे २००९)

(मित्रांनो,
मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश देशमुख यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्ताने चांगदेव पाटील यांनी लिहिलेला लेख येथे देत आहोत. बातमीदार या ब्लॉगच्या प्रवृत्तीशी हा लेख आपणांस विसंगत वाटेल.
प्रारंभी आम्हांसही तसेच वाटले होते.
पण नंतर लक्षात आले, की शैली विनोदी नसली, तरी लेखाचा आशय बातमीदारशी सुसंगत असाच आहे.
प्रकाश देशमुख यांच्यासारख्या मोठ्या बातमीदारास आदरांजली अर्पण करतानाच हा लेख आजच्या बातमीदारीविषयीही काही बोलून जातो.
आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
- बापू आत्रंगे.)

---------------------------------------------------

लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईमध्ये शिवसेना-भाजप युतीचे पानिपत झाले. मनसेमुळे ते झाले. हे असे होईल याचा कोणालाही अंदाज नव्हता. कोणीही तसे भाकित वर्तविले नव्हते. कोणाही ज्योतिषाचा तसा होरा नव्हता. या निवडणूक निकालाने सट्टेबाज, पोलवाले तोंडघशी पडले. आम्हीच समाजमनाच्या आरशात डोकावू शकतो असा भ्रम अनेक बातमीदारांना असतो. त्याचा तो भोपळाही यावेळी फुटला. अशा वेळी आम्हांला प्रकर्षाने आठवताहेत ते प्रकाश देशमुख. ते असते, तर मुंबईत, महाराष्ट्रात कोणते वारे वाहात आहे, हे नक्कीच आधीच समजू शकले असते!

'बातमीदार' प्रकाश देशमुख नसतानाची ही गेल्या ३५-४० वर्षांतली पहिलीच निवडणूक. देशमुखांचा उल्लेख येथे मुद्दामच पत्रकार वगैरे न करता, साधा सरळ बातमीदार असा केला आहे. याचे कारण म्हणजे त्यांच्या अंगात पत्रकार या शब्दाबरोबर येणारा बौद्धिक माज कधीही नव्हता. ते हाडाचे बातमीदार होते. बातमी हाच त्यांचा श्वास आणि ध्यास होता. एरवी विधिमंडळ आणि मंत्रालय वार्ताहर संघाचे अध्यक्ष, प्रेस क्लबच्या कार्यकारिणीचे सदस्य अशी विविध पदे त्यांनी भूषविली होती. पण त्यापलीकडे त्यांची स्वतःची अशी ओळख होती. राज्यभरातले असंख्य बडे बडे व सर्वपक्षीय नेते-कार्यकर्ते यांच्याशी त्यांची खांद्यावर हात टाकण्याइतका परिचय होता. त्यांचे हात मंत्री आणि नेत्यांच्या खांद्यावर सहज जाऊ शकत होते, कारण त्या हातांना कुणापुढे पसरण्याची लाचार सवय नव्हती. लाचारीने कधीही बातमी मिळत नाही. मिळते ती बातमी नसते. समाजवादी विचारांतून आलेला साधेपणा, गोरगरीबांप्रती असलेली तळमळ आणि हातातील विकली न जाणारी लेखणी ही देशमुखांच्या भात्यातील शस्त्रे होती. याच जोरावर ते प्रसंगी राज्याच्या मुख्यमंत्र्यालाही दोन शब्द सुनावू शकत असत. देशमुखांच्या या स्वभावामुळेच आमचे पत्रकार बंधु-भगिनी त्यांना विक्षिप्त, त-हेवाईक, अव्यवहारी असे म्हणत असत. या बंधु-भगिनींचेही बरोबरच होते म्हणा! देशमुख कणा शाबूत ठेऊन बातमीदारी ना करते, तर त्यांना पत्रकारितेतही मोठा गोतावळा जमा करता आला असता!

अखेरच्या काळात देशमुखांची साथ त्यांच्या प्रकृतीनेही सोडली! त्यांना मधुमेह होता, हद्रोगही होता. आयुष्यभर केलेल्या वणवणीची ही फळे होती. हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी पैसे जमवण्यासाठीही त्यांना स्वतःलाच वणवण करावी लागली. त्यासाठी त्यांना कर्जही काढावे लागले. याच काळात गरज सरो, वैद्य मरो या उक्तीचाही अनुभव त्यांना आला. ज्या संस्थेचे गुणगान गाताना त्यांची जीभ थकत नसे, त्या संस्थेची, त्या संस्थेतील काही उच्चपदस्थांची त्यांच्या अखेरच्या काळातील वागणूक ही धादांत माणुसकीशून्य होती.

आपल्या कर्तव्याआड मात्र त्यांनी कधीही आजारपण येऊ दिले नाही. हृदयावरील शस्त्रक्रियेनंतरही ते कचेरीत जात असत. बातम्या देत असत. पण आता त्यांच्या कचेरीला त्यांची गरज राहिलेली नव्हती. बातमीदारीतला ब किंवा ब्रही ज्यांना अजून नीट उच्चारता येत नव्हता, अशा कॉलेजफ्रेश मुलीही आता देशमुखांना बातमी कशी असावी, हे सांगण्यास धजावू लागल्या होत्या. देशमुखांनाही ही नवी बातमीदारी कधीही उमजली नव्हती. मॉलमध्ये या आठवड्यात कोणती नवी स्कीम आली आहे, याच्या रसभरीत बातमीऐवजी देशमुखांना सरकारने कोणती नवी योजना आखली आहे, यात रस होता. बी प्लस आणि ए प्लस वाचक ही काय भानगड आहे, हे त्यांना कळत नव्हते. ज्याला मराठी वाचता येते ते सगळे आपले वाचक, अशी त्यांची काहीशी भाबडी समज होती.

देशमुखांनी बातमीदारी केली ती प्रामुख्याने सर्वसामान्यांसाठीच. तसा आव खरेतर सारेच आणत असतात. पण देशमुखांना हे 'सर्वसामान्य' म्हणजे नेमके कोण, ते कुठे राहतात, ते काय खातात हे सगळे माहित होते. हल्ली बातमीदारांच्या मुंबईची शीव मंत्रालय, विधिमंडळ, पालिका, रेल्वे आणि पोलिस मुख्यालय यापुढे जात नाही. देशमुखांना तळहातांवरील रेषांप्रमाणे मुंबई माहित होती. राजभवन ते भांडुप-मुलुंडच्या झोपडपट्ट्यांपर्यंत सर्वत्र त्यांचे फिरणे होते. देशमुखांनी काही वर्षांपूर्वी मुंबईतील झोपडपट्ट्यांविषयी एक लेखमाला लिहिली होती. दिवसभर फिरून बातमी देण्यासाठी ते जेव्हा कचेरीत येत, तेव्हा लोक ओरडत त्यांच्यावर - "देशमुख, अंगाचा कसला वास मारतोय!" नरकसदृश झोपडपट्ट्यांतून फिरून आल्यानंतर अंगाला असाच वास येणार. देशमुख झोपडपट्ट्यांची अवस्था समक्ष पाहून येत असत आणि मगच त्यावर लिहित असत. ती लेखमाला अर्थातच गाजली, हे वेगळे सांगायला नको.

अशा प्रकारे थेट जाऊन, पाहून, लोकांशी बोलून बातमीदारी करण्याचा प्रकार आजकाल फारसा आढळत नाही. आणि म्हणूनच मग पत्रकारांचे अंदाज चुकतात. लोकसभेच्या निवडणुकीत हेच झाले. देशमुख असते, तर त्यांनी नक्कीच नेहमीप्रमाणे मुंबईभर पायपीट केली असती. अनेकांशी बोलले असते. नेत्यांच्या मसलतखान्यांपासून गल्ल्यांमधल्या पानटप-यांपर्यंत सगळीकडचे कानोसे त्यांनी घेतले असते. अभ्यासाला वस्तुस्थितीच्या अवलोकनाची जोड दिली असती. आणि मग त्यांनी जे वार्तापत्र लिहिले असते, जे भाकित वर्तविले असते, ते असे चुकले नसते!

असो.
देशमुख गेले. बरोबर वर्षापूर्वी ते गेले.
त्यांच्याबरोबर पायपीट करणा-या बातमीदारांची पिढीही इतिहासजमा झाली!
हेही आता असोच!!

(Posted by चांगदेव पाटील, दि. १८ मे २००९)
संबंधित वृत्त - प्रकाश देशमुख यांच्या स्मृत्यर्थ शिष्यवृत्ती

दिवस सुटीचा. वेळ बाराची.
दोन डिशा कांदेपोह्याच्या, वर कोपभर कषायपेय व दोन खारी, ऐसा तुडुंब अल्पोपहार नुक्ताच झाला होता. नियोजनानुसार आता वामकुक्षीची वेळ झाली होती. तेव्हा स्वतःस बा नीज गडे लडिवाळा ऐसे बजावत आम्ही डोळ्यांवर लोकमत ओढला व हाताशी सकाळ ठेवला. हाही आमुचा नित्यक्रम. लोकमतच्या अग्रलेखाने पेंग आली रे आली, की सकाळचे संपादकीय घ्यायचे! विश्वासार्ह निद्रेची शाश्वती शक्य!
एकूणात आमुचे झोपेचे प्रयोग सुरु होते, तोच दाराची कडी अवचट वाजली. हे कोण बरे तडमडले, ऐसा संत्रस्त विचार करीत आम्ही कवाडे खोलली, तर समोर साक्षात् लेले.

यांचा पण बुधवारचा विकली ऑफ झाला की काय? बोंबला! मनीं ऐसा प्रेमळ विचार करीतच आम्ही लेलेंचे स्वागत केले. अखेर काहीही झाले तरी लेले हे आमचे शेजारी आहेत. (शिवाय त्यांचेकडे एटीएम कार्डही आहे!)

नमनाला एक थेंबही तेल न दवडता, हातातील लोकसत्ता फडकावत लेलेंनी भडिमारास सुरुवात केली,
"तुम्हाला काय वाटतं, मराठीतले तुम्हीच एकमेव विनोदी पत्रकार आहात काय?"
"ऑं!?!??" लेलेंच्या या प्रश्नाने आम्ही भुईसपाटच झालो. काय उत्तरावे तेच सुचेना.

वास्तविक आमच्या मते, आम्ही म्हणजे हजरजबाबी! जाबसालात हार जाणार नाही कोणास! कोणताही प्रश्न फेका आमुचे उत्तर तयार! सह्याद्री, साम मराठी या वाहिन्यांवरून कित्ती कित्ती अवघड बहुपर्यायी प्रश्न विचारतात. उदाहरणार्थ परवा त्यांनी प्रश्न विचारला होता, की माहेरची साडी या सिनेमात कोणत्या अभिनेत्रीने काम केले होते - अलका कुबल, अलका बुकल की अलका कबुल? केवढी काठिण्यपातळी! सर्वसामान्य प्रेक्षकांच्या ज्ञानाची केवढी मोठी ही परीक्षा! पण आम्हांस काय नाय त्याचे! एका फटक्यात सांगून टाकले - अलका कुबल. तथापि लेलेंच्या या प्रश्नाने आमुचे दोन्ही मेंदू आमूलाग्र हलले!

"लेले, अहो असं कसं म्हणता! केवढे बडेबडे विनोदी पत्रकार-लेखक आहेत मराठीत..."
"नाव घेऊन बोला. हवे तर त्यांच्या पेपरचे नाव नाही घेतले तरी चालेल. दुस-या पेपरातले असतील, तर नुसते ज्येष्ठ पत्रकार म्हटले तरी पुरेसे! पण नाव घेऊन बोला..," लेलेंनी बोलता बोलता मराठी पत्ररुढीच्या कासोट्यालाच हात घातला!
"अहो, मटातले चकोर आहेत. छान, ओल्या नारळाच्या करंजीसारखं लिहितात... खुसखुशीत! आमचे लोकसत्तेतले तंबी दुराई आहेत. भाषा बघा त्यांची आणि विनोदाची खोली! झालेच तर महागुरु प्रवीणभाई टोकेकर आहेत... भंकसकार विसोबा खेचर आहेत... कुणाचे नाव घ्यायला आपण डरतो की काय!!"
(बोलता बोलता जठरातील ऍसिडिटी एकदम घशातच आली! हा चहाखारीचा परिणाम की कुणाबद्दल बरे बोलल्याचा? डॉक्टरला दाखविले पाहिजे!)
"हेच ते... हेच ते... तुम्ही म्हणजे तुमच्या जवळच्या लोकांचीच नावं घेणार! बाकीच्या पत्रकारांमध्ये विनोदबुद्धीच नाही, असं वाटतं ना तुम्हाला!!" लेले खवळून बोलले.
(हे आमचे जवळचे लोक? मनःपूर्वक व सविनय सांगतो, त्यांच्या सावलीशी जाण्याचीही आमची पात्रता नाही!)
"नाही नाही, असं कधी म्हटलो मी? बाकीच्या पत्रकारांमध्ये विनोदबुद्धी नसती, तर एवढे विनोदी पेपर निघाले असते का?"
"करा, करा, टीका करा... कोणत्या पेपराबद्दल तुम्ही कधी चांगलं म्हटलंय का?"
"लेले, अहो विनोदाला विनोदी म्हणायचं नाही, तर काय म्हणायचं? आता परवाची सकाळमधली बातमी बघा.. संपादक विशेष प्रकल्प म्हणून नियुक्ती! संपादक... विशेष प्रकल्प!?" (खीखीखी!!!)
"मग त्यात हसण्यासारखं काय आहे? उलट अशी अभिनव पदनामे निर्माण करण्याच्या हातोटीबद्दल सकाळकारांना शाल व श्रीफल द्यायला पाहिजे!!"
"आणि हा पुढारी..."
"त्याचे काय? तो आला ना?"
"आला ना! पण येण्यापूर्वी किती छान वाटत होता!!"
"मग?"
"अंधारात कोणीतरी आपल्याला भॉ करतं. आपण एकदम दचकतो. आणि मग कशाला घाबरलो, म्हणून हसायला लागतो!" आम्ही किंचित फिलॉसॉफीत शिरलो.
"त्याचा पुढारीशी काय संबंध?"
"आहे ना! लोकमत आणि सकाळमध्ये लोक हल्ली असेच हसताहेत!.... हे सगळं विनोदी नाही काय लेले?" आम्ही इनोसण्टली विचारले.
"पण हे पेपरांबद्दल झालं. मी पत्रकारांबद्दल बोलतोय," लेले मुद्दा काही सोडत नव्हते.
शेवटी आम्हीच हार पत्करली, "असतील ना.. पत्रकारही विनोदी असतील..."
"असतील नव्हे, आहेतच. मी पुराव्याने बोलत असतो!"
पुरावा? पत्रकार विनोदी असल्याचा चक्क पुरावा आहे लेलेंकडे? आमचे दोन्ही मेंदू तिनशेसाठ अंशात चक्रावले.
"हा बघा आजचा लोकसत्ता. वाचा ही बातमी. बघा यात काय म्हटलंय..."
"अहो, ही कसाबच्या खटल्याच्या सुनावणीची बातमी आहे."
"पुढे वाचा ना... काय म्हटलंय? 'न्या. टहलियानी यांनी, तू ओंबळेंचे नाव उच्चारताच का हसतोस अशी विचारणा कसाबकडे केली. त्यावर कसाबने आपण जाणूनबुजून हसत नाही, तर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आपल्याला हसायला भाग पाडतात, असा दावा केला.' आलं ना लक्षात? अहो भर कोर्टात एका क्रूर कसाबाला हसायला लावणे म्हणजे काही सोपे काम नाही! पण आपल्या न्यायालयीन प्रतिनिधींनी ते केले आहे. म्हणजे कसाबचा तसा दावा आहे. आणि तो खरा असेल, तर बापू, आपले सर्व पत्रकार हे अत्यंत विनोदी आहेत, हे तुम्हाला मान्य करावेच लागेल."
आता एवढे सगळे वाचल्यानंतर, आम्ही तरी ते कुठल्या तोंडाने अमान्य करणार होतो?

आम्ही मग सगळेच हसण्यावारी मान्य केले
व मग हसण्यावारीच समस्त पेपरे वाचू लागलो...

(Posted by बापू आत्रंगे, दि. १३ मे २००९)

निवेदन  

बातमीदारवर नवा लेख घेऊन लवकरच येतोय...
तोवर वाचा -
पूढारितील मूद्रीतशोध नाचा येटकोळ!
ढापूकलेचा नवा नमुना
लोकप्रभेतला जोडा
आणि बरेच काही
सहयोगी बातमीदारमध्ये...

गणगौळण  

आता निस्तं समजायचं बरंका मंडळी...
निस्तं समजायचं, का ह्यो एक रंगमंचहे. ह्या रंगमंचावर नेपथ्या म्हनून एक परदा सोडलेलाहे. त्या परद्यावर यमुनेचं चित्र काडलेलंहे. यमुना म्हंजे रात्र काळी, घागर काळी यमुनाजळी काळी वो मायमधली यमुना! आधीच स्पष्ट केलेलं बरं. नाय तं तुमचा गैरसंबंध व्हायचा! त्या यमुनेच्या काठावर एक वडाचा डेरेदार वृक्शहे. रंगमंचाच्या मोहरं पब्लिक म्हंजी मायबाप प्रेक्शकजन बसलेलंहे.

पन मंडळी ह्यो इव्हेंट हाय तरी काय?
तं तुम्हाला आता लई ताटकळत ठेवत नाय. सांगूनच सोडतो, का इथं आता गनगौळन व्हनार हाय. ते बगा 'घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निगाल्या पान्या गौळनी' या गवळनगीताचं बॅकग्राऊंड मुझिकबी सुरु झालं.
(सारेगमप लिटिल च्यांपमधी हे गीत कोनी गायलं व्हतं? पल्लवी जोशीनं की कार्तिकी गायकवाडनं? या प्रश्नाचं बरोबर उत्तर देना-या पयल्या दहा पत्रकारांना, मुंबईत पुढारी नेमका कव्हा लॉंच व्हनार याची तारीख पोस्टाने कळविन्यात येईल. तव्हा पाचपाचपाच चारपाचपाच या क्रमांकावर लगेच यसेमेस करा.)
ते बगा, आला... आला... (पुढारी नव्हं!) रंगमंचावर गवळनींचा जथा आला...


पेंद्या - स्टॉप. कोणीही यापुढं जायचं नाही... खबरदार! जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या...
मावशी - येss, चिंधड्या कोणास म्हणतो रे फुल्याफुल्याफुल्या?
पेंद्या - छट्, वाक्य पण पूर्ण करु देत नाहीत!... डायरेक्टर, आपण गणगौळण सादर करतोय की 'आजचा सवाल'? च्यामारी, सगळेच आजकाल अर्णब गोस्वामी झालेत!!
मावशी - अगंss बाई! वाक्य अर्धवटच राह्यलं का तुमचं? बोला बोला...
पेंद्या - आता बोलाबिला काही नाही! आधी मला सांगा तुम्ही कुठं चाललात?
गौळण - मावशे, कोण गं हा ऑम्बुडस्मन?
पेंद्या - मी कोण? मी कोण? माहित नाही तुला?
गौळण - सगळं माहित असायला, मी काय त्रिकालवेधी आहे? तेवढा दृष्टिकोन नाही माझ्याकडे!!
मावशी - अगं पेंद्या आहे तो! त्याच्या नाववरचा पीआरबीचा स्टार तरी लक्षात घ्यायचास! हा स्टार लागला की माणसाला वाटतं, आपण किती विद्वान, आपण किती प्रसिद्ध! पण हल्ली ना, केवळ पत्रिकेत स्टार असतील ना, तर कोणालाही हा स्टार मिळतो.... म्हणजे, असं पुण्यात म्हणतात!
गौळण - ओह आय सी!
पेंद्या - पटली ना ओळख? मग आता मला सांगा, कुठं निघालात तुम्ही?
मावशी - हा पेंद्या म्हणजे गेल्या जन्मी नक्की उपसंपादक असला पाहिजे! त्यांना रोजरोज तीच ती पानं लावून कंटाळा येत नाही. आणि याला रोजरोज तोच तो सवाल विचारून बोअर होत नाही! अरे, आम्ही मथुरेच्या बाजाराला निघालो आहोत...
पेंद्या - बाजाराला? ते कशासाठी?
गौळण - प्रेस कॉन्फरन्स आहे कॉकटेल-डिनरवाली! येतोस? अरे, प्रॉडक्ट विकायला चाललोय आम्ही.
पेंद्या - मग अजिबात जाऊ नका. बाजार आधीच सॅच्युरेट झालाय. आता तिथं स्कोप नाही.
मावशी - कोण म्हणतो स्कोप नाही? मार्केटिंग पक्कं असलं ना, तर कुठंही दर्डावून सेल करता येतो. हे इकॉनॉमिक्स जरा पुढार-लेलं आहे. तुला समजायचं नाही!
पेंद्या - मग तू समजावून सांग.
मावशी - तसं काही फार अवघड नाही ते. आता हे बघ. हे काय आहे? निरसं दूध. क्वालिटीदार. पण त्याची किंमत जास्त. प्रॉडक्शन व्हॅल्यू जास्त. आपण ते विकायचंच नाही. आपण दूध घ्यायचं. त्यात जरा पाणी घालायचं. थोडा युरिया घालायचा. किंचित साखर घालायची. क्वांटिटी वाढवायची. तिकडं कोल्हापुरात तर दुधात तिखट मसालासुद्धा घालतात! आणि असं दूध सुरवातीला स्वस्तात विकायचं. रुपयाला एक शेर! लोकांचं काय आहे, लोकं नुसती दुधाची पिशवी बघतात! ती झॅकपॅक असली म्हणजे झालं!... आणि महत्त्वाचं म्हणजे, बाजारात दुस-या डेरीचं दूध सहसा येवूच द्यायचं नाही. किरकोळ विक्रेत्यांना लोणी लावलं, की तेही जमून जातं... पुढं पुढं लोकांनाही मग अशाच दुधाची सवय लागते! मग त्यांना सकाळ-चं रतीबाचं दूध नको होतं!
गौळण - मावशे, अगं त्याला असं सांगून समजायचं नाही. त्यापेक्षा पेंद्या, तूच चल ना आमच्याबरोबर बाजाराला. समक्षच सगळं बघता येईल तुला...
मावशी - खरंच की! चल की. आपण वन डे वुईथ मावशी करू या!

(वन डे वुईथ मावशी करायचं आसंल, तं त्या पॅकेजची किंमत किती व्हईल? या प्रश्नाचं बरोबर उत्तर देना-या पयल्या दहा टीव्ही पत्रकारांना, एका पेडन्यूजच्या पैशांचा चेक घरपोच पाठविला जाईल. तव्हा आपापल्या मार्केटिंग खात्याला लगेच यसेमेस करा. नंबर तं सगळ्यांनाच माहित हाये!!)

पेंद्या - मावशे, तू तर गोरस विक्रीचा धंदाच करायला लागलीस?
गौळण - येss, धंदा म्हणायचं काम नाही! हा धंदा असला, तरी त्याला व्यवसाय म्हणायचं!
मावशी - पाणीदार दूध असलं, तरी त्याला प्रॉडक्ट म्हणायचं!
गौळण - आणि एकदा प्रॉडक्ट म्हटलं, की सगळं माफ असतं. ते विकलं जातं की नाही, एवढंच महत्त्वाचं असतं!
पेंद्या - हे काही खरं नाही! काही खरं नाही! आपल्याला काही हे जमणार नाही! आपल्याला काही हे पटत नाही!
मावशी - पेंद्या, तुला एक सल्ला देऊ?... बाळा, असं काही चुकूनही रडू नकोस. असं रडणाराचं काय होतं माहित आहे का?
पेंद्या - काय होतं?
मावशी - तो आजी असेल, तर माजी होतो. नाही तर...
पेंद्या - नाही तर?
मावशी - नाही तर काय य माजी होतो!!

(Posted by बापू आत्रंगे, दि. ४ मे २००९)