ऑस्करच्या लहानग्या बाहुलीची कित्ती मोठी सावली पडलीये...!!
अहाहा! आम्ही बेहद्द व बेसुमार खुश आहोत!
स्लमडॉगला आठ ऑस्कर पुरस्कार!
ही घटना कायमची आठ-वणीत राहील...
आपल्या आणि च्यानेलवाल्यांच्याही!!
आता आम्ही वाट पाहतोय उद्याच्या वृत्तपत्रांची.
म्हणजे असे, की स्लमडॉग मिलेनियरला आठ ऑस्कर पुरस्कार मिळाले ही बातमी तर आज समस्तांस समजली. वाहिन्यांनी तर आता फक्त धारावीतले नाले तेवढे उपसायचे बाकी ठेवले आहेत! अशा परिस्थितीत वृत्तपत्रे देणार ते काय देणार? सांगणार ते काय सांगणार? छापणार ते काय छापणार? येथे खरा कस लागणार आहे मुद्रित माध्यमांचा.
उद्या आपणांस वाचावयास मिळतील का खास लेख स्लमडॉगच्या यशाचे रहस्य सांगणारे?
उद्या आपणांस कोणी सांगेल का रेहमानच्या त्या संगीतात अशी कोणती जादू होती?
उद्या कोणी उलगडून दाखविल का डॅनी बॉयलच्या दिग्दर्शनाचा अर्थ?
उद्या कोणी सांगेल का मूळ कादंबरी आणि तिच्यावरून रचलेल्या पटकथेतील नेमके नाते?
की आठ कॉलमी आकर्षक मथळ्यांच्या वेस्टनात गुंडाळली जाईल शिळ्याच बातमीची मिठाई?
पण उद्याचे उद्या!
आज आम्ही खूपखूप आनंदात आहोत.
किती तरी दिवस झाले नवी चप्पल घ्यायची म्हणतोय.
लोकलच्या पाससाठी पैसे काढून ठेवले पाहिजेत.
सोसायटीच्या मेन्टेनन्सचे पैसे थकलेत, ते भरा म्हणतोय चेअरमन.
पण आज त्याचे काही नाही.
आज आम्ही बेहद्द आणि बेसुमार आनंदात आहोत!!
वाचनाबद्दल आमच्या काही ठाम कल्पना आहेत.
एक म्हणजे दुर्मिळ ग्रंथमहर्षि डॉ. अरूण टिकेकर व आम्ही असे मानतो, की वाचाल तर वाचाल!
म्हणजे कसे, तर समजा तुम्ही रस्त्याने चालला आहात व पुढे खड्डा आहे, हा फलक तुम्ही वाचला नाही, तर तुम्ही त्या खड्ड्यात पडाल की नाही? मग?... कित्ती बले सोप्पे!!... वाच्याल तल वाच्याल!
(सूचना - उपरोक्त अभिजात विनोदाचा कॉपीराईट आमचा आहे. कोणीही हास्यरंगमध्ये तो छापून विनोदाचे पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावू नये!)
दुसरी बाब म्हणजे आपण जे काही वाचू त्यातून आपणांस काही तरी मिळालेच पाहिजे.
याचा दुसरा अर्थ असा, की ज्यातून काहीही, म्हणजे उदाहरणार्थ पुस्तक परिक्षणाचे नगद १५० (अक्षरी दीडशे फक्त) रुपये मिळणार नाहीत, ते वाचू नये! अर्थात हेच (दीडशाचे) तत्त्व बहुत उपसंपादक पाळतच असल्याने यात नवीन असे काही नाही!
परंतु मनुष्यप्राण्याने प्रत्येक गोष्टीत अशी भौतिक फळाची अपेक्षा का बरे धरावी? उलटपक्षी कोणत्याही अपेक्षा न धरता आपण सर्वांनी वाचनकार्य केले पाहिजे. श्रीमद्भगवद्गीतेत प्रत्यक्ष भगवंतानेच उपदेशिले आहे, की कर्मण्येवाधिकारस्ते....
अगबाईअरेच्चा! आमची भाषा अशी अध्यात्मिक अंगाने का चाललीय?....
हां. हा आमच्या हिचा चावटपणा! समोर दूरचित्रवाणीसंचावर मराठीतला आस्था जो की साम मराठी च्यानेल, तो लावून ठेवलाय. त्यावर नेहमीच पपू श्री बालाजी तांबे यांचा गीता गाता चल वा तत्सम कार्यक्रम सुरु असतो, म्हटल्यावर कोणासही वाण वा गुण लागणारच!... जसा की तो रा. रा. संजीवकुमार लाटकर (पक्षी - वाहिनीप्रमुख, साम) यांस लागला आहे! हल्ली त्यांच्यात कशी स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणे दिसतात नाही! सुखदुःखे समैकृत्वा की असेच काहीतरी!! अस्तु.
तर मुद्दा असा, की आम्ही अनेकदा कोणतीही अपेक्षा (म्हणजे उदाहरणार्थ वाचनाने झोप यावी वगैरे) न धरता वाचन करतो. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे आम्ही पत्रकारांनी लिहिलेली पुस्तकेही वाचतो. (आम्हांस आम्लपित्ताचा जबरी त्रास! तरीही आम्ही हे धाडस करतो यावरून तुम्हांस आमच्या वाचननिष्ठेची पावती मिळेल!) तर परवाच आम्ही एका पत्रकार-लेखकाचे, तेही पुणेरी लेखकाचे पुस्तक वाचले. (संजय आवटेंचे नव्हे! त्यांचे ओबामांवरील पुस्तक हे भल्तेच विक्रमी आहे असे ऐकतो. ते वाचून अनेकांचे 'बराकी'करण झाल्याची अफवा आहे. फार कशाला, ते वाचून खुद्द लेखकासही आपण निवडणुकीला उभे राहून हे विश्व सुंदर करावे, असे वाटू लागले आहे म्हणतात!)
नमनालाचा एवढे शब्द जाळल्यानंतर आता सांगूनच टाकतो, की आम्ही नुकतेच रा. रा. श्री. ज. जोशी यांचे पुणेरी हे पुस्तक वाचले. पुस्तकातील प्रकर्णे मोठी बहारीची व ज्ञानवर्धक होती. (अर्थात हे सांगण्याकरीत संपूर्ण पुस्तक वाचण्याचीही आवश्यकता नाही. नुसत्या अनुक्रमणिकेवरूनच ते कळते. अनुक्रमणिकेत आमच्या पिढीचे कामजीवन असे एका प्रकरणाचे नाव आहे!) या पुस्तकातील दैनिक काळमधील दिवस हा धडा वाचून तर आम्हांस भारीच मौज वाटली. त्यात किनई एकेठिकाणी जोशीबुवांनी रा. रा. शिवरामपंत करंदीकर या संपादकांचा एक कमालएकिस्सा सांगितला आहे. हे रा. रा. करंदीकर म्हणजे त्रिकाळ दैनिकाचे मालक-संपादक. ते पूर्वी मास्तर होते. (म्हणजे बघा, पूर्वी शाळामास्तर सुद्धा दैनिक काढू शकत असत! आता दैनिक काढायचे म्हटले, तर केवढी शाळा करावी लागते! हाती मंत्रिपद नसेल, तर दैनिक चालविणेही कठीण, असा समय पातला आहे हल्ली! नारायणरावांच्या हे बरोब्बर लक्षात आले म्हणतात! अस्तु.) रा. रा. करंदीकर हे पूर्वीचे मास्तर. त्यामुळे ते चाटे नव्हते, तर चांगलेच ध्येयवादी वगैरे व इत्यादी होते. एवढे ध्येयवादी, एवढे पत्रधार्मिक, एवढे काटेकोर की 'एका अग्रलेखात शुद्धलेखनाच्या दहापंधरा चुका आढळल्यानंतर, त्यांनी तोच अग्रलेख दुरुस्त स्वरुपात दुस-या दिवशी पुन्हा छापला होता व वाचकांची माफी मागितली होती.'
हे वाचल्यानंतर तर आम्ही खीखीखी करून लोटपोटच हसलो!
(व मग आम्हांलाच आमचे दात दिसले!)
मनीं आले, हे एडिटरबाबा आताच्या काळात असते, तर काय झाले असते?
त्यांना रोज कालचा अंक पुन्हा छापावा लागला असता!!
नाही, असे नाही.
ते मटामध्ये असते, तर त्यांना कॉस्ट कटिंगचे कारण देऊन घरीच पाठविण्यात आले असते!
सकाळमध्ये असते, तर माणूस मोठा पत्रकार, म्हणून त्यांना सकाळ भाजीपाला समितीचे काम देऊन कचेरीतच 'बसविले' असते!
लोकसत्तेत असते, तर त्यांना वास्तुरंगच्या पडक्या पुरवणीत टाकले असते!
(खरे तर आज ते लोकसत्तेत असते, तर त्यांना काहीच करावे लागले नसते! कारण की आजकाल लोकसत्तेत जाहिराती येवढ्या पान-गळ्यापर्यंत येताहेत, की 'कंपनी मस्ट' बातम्या जाण्याचीही मारामार! तेथे कोठे शुद्ध शोधणार आणि कोठे लेखन शोधणार!!)
लोकमतमध्ये असते, तर...
छे! ते लोकमतमध्ये असूच शकले नसते! (हवे तर महावीरभाईंना विचारा!)
एकूणच आजकाल अशा करंदीकरमहाराजांना पत्रसृष्टीत स्थान व ठिकाण नाही!
शुद्धलेखनाचे सोडा, ते हल्ली सत्वशीला सामंतबाई, यास्मीन शेखबाई व अरुण फडकेबाबा यांशिवाय (आम्हांसकट) कोणास येते?
परंतु साधी, सरळ मराठी भाषा. तिचे काय?
आंग्ल दैनिकांत रिडर्स एडिटर असा प्रकार असतो.
हिंदुस्तान टाइम्ससारखे दैनिक अल्प व स्वल्पविरामाच्या चुकाही दुस-या दिवशी दुरुस्त करून, वर वाचकांस क्षमस्व म्हणते.
आणि आम्ही मराठी?
जाऊ देत झाले.
ते पुस्तक वाचले हीच चूक झाली.
(Posted by बापू आत्रंगे, दि. २० फेब्रु. २००९)
आमचा एक वाचकमित्र आहे.
तो खूप आजारी आहे.
त्यास हशारोग झाला आहे.
तो सारखा हासत असतो.
तो कशालाही हासत असतो.
उदाहरणार्थ
परवा त्यास म्हणालो, रा. रा. कुमार केतकर हे त्रिकालवेधी पत्रकार आहेत. त्यांनी त्यांच्या सदरात पपू बापूंच्या (पक्षी - अनिरुद्ध बापू) अभ्यासाचा संदर्भ दिला होता!
तर तो म्हणाला, बापूशेट, यक्दा वय झालं की मान्सं आशी बगता बगता सहिस्नु व्हत जात्यात!
व तो फिसकन् हासला!!
एकदा त्यास सांगितले, की पुढारी व लोकमत यांनी मोठी विस्तार योजना आखली आहे. पुढारी औरंगाबादेतूनही निघणार आहे. शिवाय देवगिरी तरूण भारतही सुरु होतोय औरंगाबादेतून. तर तो डोळे बारीक करुन पुटपुटला, की म्हंजी आता अनुक्रमे ईलासराव द्येसमुक आन् गोपीनाथ मुड्यांची काळजी मिटली म्हनायची! औरंगाबादच्या लोकमतनं तं ईलासरावांस्नी पार बेदकलच केलं व्हतं!!
व मग तो खीखी करून हासत राहिला!!
काल आम्ही त्यास चिडून दूरध्वनी केला. म्हणालो, हे ऐकलेत? तिकडे सान होज्यास आपले मराठी पत्रकार गेले. तर त्या विश्व साहित्य समंलेनवाल्यांनी पत्रकारितेवरचा परिसंवादच रद्द करून टाकला. तर मांडीवर थाप मारून तो म्हणाला, पत्रकारांना फुक्टात न्यायचं तं न्यायचं आनी वर पुन्हा त्यांची भाषनं ऐकून घ्यायची, हा येव्हार घाट्याचा व्हनार हे त्यास्नी बराब्बर समाजलं म्हनायचं! शिवाय याच्यातून एकूनच विश्वसाहित्यामधली म-हाटी पत्रकारितेची जागाबी आपुआपच अधोरेखीत झाली की राव!
व असे म्हणून तो हीहीही हासत बसला!!
ही तेरवाची गोष्ट. त्यास म्हटले, की मारिओ गार्सिया हे रिडिझाईनकार हिंदुस्तान टाइम्सचा लेऔट बदलणार आहेत! हिंदु आणि मिंट नंतर एचटीने सुद्धा त्यांना ऑर्डर दिली म्हटल्यावर माणूस मोठाच असणार! तर तो चावटपणे म्हणाला, मानूस मोटाच हाय त्यो! त्याशिवाय का सकाळवालं त्येच्या डिझाईनीचं दैनिक पंचकोटी श्राद्ध घालत्यात!
व तो विषादाने हः हः हः हासता झाला!!
आज सकाळी तो आम्हांस भेटला, तोच मुळी खुखुखुखु खिदळत.
म्हटले, एवढा का हासतोयस बाबा? व्हॅलन्टाईन डेने केलेली राऊतांची रोखठोक गोची का वाचलीस तू?
तर तो कसेबसे हसू रोखत मानेनेच नाही म्हणाला.
तेव्हा आम्ही त्यास म्हणालो, मग आजच्या मुंबै सकाळच्या मुखपृष्ठावरील (दि. १६ फेब्रु.) नाट्यसंमेलनाच्या बातमीचा मथळा वाचला आहेस काय? - 'सांस्कृतिक महोत्सवाची उत्स्फूर्त सांगता!' - सांगता आणि तीही उत्स्फूर्त! म्हणजे बीडकरांनी जणू कंटाळून व वैतागून नाट्यसंमेलनाचं सूप वाजवून टाकले! मराठीच्या या सविनयभंगाने तर तुस हसू येत नाहीये ना?
तर हे ऐकून तो आणखीच हासत मानेने नाही म्हणाला.
तेव्हा आम्ही पुसले, अरे सुहृदा, मग तुझ्याने का लोकसत्तेतील चंद्रशेखर कुलकर्णी यांची, 'प्राजक्तासम हळुवार पडलेल्या सप्तसुरांच्या सड्या'ची अर्थात हृदयनाथांच्या भावार्थ सरगमची मधूरमधाळ बातमी वाचणे झाले का?
तर तो म्हणाला, हॅ! त्याच्यात हासन्यासारकं काय हाये? उलट ती बातमी वाचून लोकं इन्सुलिनची इंजेक्शनं टोचून घेत्यात!
तेव्हा आम्ही कृतक्कोपाने त्यास म्हणालो, की आता तू सांगणार आहेस की नाही काय झाले ते?
तेव्हा तो हसू आवरत उत्तरता झाला, की आज कंच्याबी पेपरात प्रसिद्ध न झालेला लेख वाचूनच मला हासायला आलंया!
हे म्हणजे अतिच झाले!
आम्ही - अरे कोणता प्रसिद्ध न झालेला लेख?
तो - सादासुधा लेख नाही, आग्रलेख!
आम्ही - म्हणजे?
तो - गेले दोन-तीन दिवस आम्ही वाट पाहून राह्यलोय एका आग्रलेखाची... पर कोनी काय लिहितच नाही म्हनल्यावर सारखं हासूच येऊन राह्यलंय...
आम्ही - अरे, पण कोणत्या विषयावर तुस अग्रलेख अपेक्षित होता?
त्यावर तो टवाळ म्हणाला, ते आम्ही सांगितलं, तं तुमच्या निर्भिड बान्याची इज्जत काय राहिल वो पेपरवाले? तव्हा ते काय आमी सांगू नये आनी तुम्ही आम्हाला इचारू नये....
व असे म्हणून तो चांडाळ चक्क हॉहॉहॉ हसत निघून गेला!
वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष आणि अन्य हो,
तेव्हापासून आम्ही आमचे दोन्ही मेंदू शिणवतोय, की असा कोणता अग्रलेख आमच्या त्या वाचकमित्रास अपेक्षित असेल?
रा. रा. आनंद यादवांचा तुकाराम इंद्रायनीत बुडविण्यात आला. त्यावर वृत्तपत्रांनी ठोस भूमिका घ्यायला हवी होती, असे तर त्यास वाटत नसेल? एक महाराष्ट्र टाइम्स सोडला, तर त्यावर अद्याप कोणीही लिहिलेले नाही. पण आमच्या त्या मित्राला हे कोण सांगणार, की बाबा रे, निवडणूक तोंडावर आलेली आहे. अशात अशा विषयाला हात घातला आणि मालक दुखावला तर? कोण घेणार बरे ती रिस्क?
जाऊ दे! आमच्या मित्रास हवे तितके हासू दे...
नाही तरी त्याला हशारोग झालेलाच आहे!
(Posted by बापू आत्रंगे, दि. १६ फेब्रु. २००९)
मित्र हो,
तुमच्याशी आज जरा वेगळ्या विषयावर, वेगळे असे काही बोलायचे ठरवून आलो आहे.
आमचे मन विषण्णतेने भरून गेलेले आहे.
परवा सारेगमप या सांगितिक कार्यक्रमाची अंतिम फेरी झाली. आणि त्यानंतर महाराष्ट्रात जे काही झाले, जे काही होत आहे ते सर्व पाहून संताप होत आहे.
या कार्यक्रमानंतर आयोजकांची पत्रकार परिषदेत झाली. तेथून या बेसूर आणि भेसूरपणाला सुरुवात झाली. त्यात काही पत्रकारांनी जे तमाशे केले ते अत्यंत लाजिरवाणे होते.
आपण पत्रकार आहोत म्हणजे आपण काही खास आहोत, कोणालाही काहीही विचारण्याचा, कोणाचाही अपमान करण्याचा परवाना आपल्याकडे आहे, असा अनेकांचा समज असतो. त्याचेच गलिच्छ दर्शन या पत्रपरिषदेत झाले, असे तेथे उपस्थित असलेल्या काही पत्रकारांकडूनच आम्हांस समजले. साधे मॅनर्सही पत्रकारांना पाळता येत नसतील, तर त्यास काय म्हणावे?
त्या पत्रपरिषदेतील घटनांवर आमच्या एका मालवणी पत्रकारमित्राने केलेले झणझणीत भाष्य (सारेगमपच्या प्रेसकॉन्फरशीच्या गजाली) 'सहयोगी बातमीदार'मध्ये प्रसिद्ध केले आहे. मालवणी विनोदाआडून त्याने व्यक्त केलेली खंत आपण लक्षात घ्यावी.
महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या मनाची स्पंदने समजण्याची ताकद ज्यांच्यात आहे अशा काही वृत्तपत्रांनी या कार्यक्रमावर अग्रलेख लिहिले. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र टाइम्स, प्रहार, लोकमत, तरुण भारत यांची नावे घ्यावी लागतील. (या अग्रलेखांच्या लिंक्स खाली दिल्या आहेत.) लोकसत्तेने तर यापूर्वीच यावर अग्रलेख लिहिला होता. सकाळने मात्र या कार्यक्रमावर अग्रलेख लिहिला नाही. त्यांच्या न-धोरणात ते बसत नसावे! अर्थात सकाळने कोणत्या विषयावर अग्रलेख लिहावेत हा त्यांचा प्रश्न आहे, हे मान्य करूनही सकाळचे हे मौन खटकणारे होते!
मात्र आम्हांस सर्वात जास्त दुःख होत आहे ते याचेच, की या कार्यक्रमाच्या निकालावरून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी (त्यातही पुण्यात जरा जास्तच) ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर असा वाद निर्माण झाला आहे. आणि त्यात भर घालणा-या बातम्या आम्ही प्रसिद्ध करीत आहोत.
एका सूरमयी कार्यक्रमाची एवढी भेसूर भैरवी कोणी पाहिली नसेल, ऐकली नसेल!
(Posted by बापू आत्रंगे, दि. ११ फेब्रु. २००९)
सारेगमविषयीचे अग्रलेख :
मन सुद्धं तुझं... (मटा)
हे सुरांनो चंद्र व्हा! (लोकमत)
'सारेगमप'चे 'धनी' (प्रहार)
कार्तिकीदेवींचा विजय असो (तरूण भारत)
सारेगमपविषयीच्या ब्लॉगपोस्ट्स :
सारेगमपमधील सूर आणि बेसूर - नीलेश बने (मटा ब्लॉग)
लिटिल चॅम्प्सच्या जातीवरून खाल्ली माती! - प्रशांत जाधव (मटा ब्लॉग)
त्यांचा इमोशनल जयजयकार - रवि आमले (मुंबई मेट्रो, सकाळ)
स्टार-ए-आझम राजीवजी खांडेकर यांचा लोकसत्तेच्या लोकरंगातील लेखमाझाचे नाव 'न्यूज चॅनेल पाहायला शिका!' असे असल्याने बहुसंख्याकांचा ऐसा समज झाला, की हे काहीतरी अभ्यास माझा वा तत्सम प्रकरण असावे! त्यामुळे अनेकांनी हा लेखमाझा ढॅण्टॅढॅणप्रमाणे नुसताच नजरेखालून घातला!
वास्तविक तो वाचणे गरजेचे होते. कारण की अखेर आपल्या सर्वांच्या (म्हणजे बालबुद्धीची नवशिकी पोरंसोरं, पांडित्याची झूल पांघरलेले विद्वतजन, स्वयंघोषित विचारवंत, रांगणारी बाळे, सतत रेकून आरोप करणारे, अपप्रचारक, बघे प्रेक्षक, अज्ञानमूलक आरोप करणारे, २६-११ चे विषण्ण वातावरण असताना गुटख्याची पाकिटे तोंडात रिकामी करून पचापचा थुंकत खांद्यावरच्या पोराबाळांना वो देखो फायरिंग हो रहा है, वो देखे आग लगा दी असे कौतुकाने दाखविणारे आदीकरून समस्तांच्या) अकलेचा उद्धार करण्यासाठीच तर रा. रा. राजीव खांडेकरांनी हा लेखप्रपंच मांडला होता. अन्यथा त्यांस का अन्य (म्हणजे अँकरमाझांची वटवट ऐकून दिवसातून अनेकदा आपुल्या कपोली आपुला हात मारून घेणे वगैरे) कामे नाहीत? परंतु समाजप्रबोधन हा तर पत्रकाराचा बाणा असे. या बाण्यास स्मरूनच मागे एकदा राजीवश्रींनीच च्यानेलांस कुटकुटकुटणारा लेख लोकसत्तेतच लिहिला होता म्हणे! परंतु तेव्हा त्यांस च्यानेलवाल्यांच्या अकलेच्या उद्धाराची फिकीर होती. आता त्यांस प्रामुख्याने पेपरांतून लिहिणा-यांच्या उद्धाराची काळजी आहे! राजीवश्रींचे हे कसब, ही लेखनहुन्नर वाखाणण्यासारखीच म्हणावी लागेल!
तेव्हा आता वाचकहो, गपगुमान उघडा डोळे आणि पाहा नीट, की राजीवश्रींचे कैसे लिहिणे, कैसे युक्तिवाद करणे, कैसे शहानिशा करणे वगैरे वगैरे...
आपुल्या लेखमाझात राजीवश्री पहिल्याछूट वृत्तवाहिन्यांवरील पहिल्या आक्षेपाचा खमंग समाचार घेतात. ते स्पष्टच सांगतात, की "...न्यूज चॅनेलवर त्याच त्याच बातम्या पुनःपुन्हा दाखविल्या जातात. खरे तर हा आरोप अत्यंत तकलादू आहे. चोवीस तासांचे न्यूज चॅनेल चालवणा-यांनी प्रत्येक मिनिटीला नवी बातमी द्यावी अशी अपेक्षा बाळगणेच मुळात बाळबोधपणाचे आहे." वास्तविक पाहता नव्याने आलेल्या प्रेक्षकालासुद्धा त्यावेळेपर्यंतच्या बातम्या समजल्या पाहिजेत, या निरपेक्ष भावनेनेच न्यूज चॅनेल त्याच त्या बातम्या दाखवित असतात! केवळ त्याच त्या बातम्याच नव्हे, तर एकाच बातमीत एकच दोनपावणेदोन सेकंदी दृश्य पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा दाखवित असतात!
बरे या बातम्या तरी कशा असतात राजे हो! तर "हजारो बातम्यांमधल्या निवडक"! या निवडकपणाची व्याख्याही राजीवश्रींनी तेथेच कंसात करून टाकलेली आहे. ते सांगतात, की "ज्या आपल्या आयुष्याशी संबंधित आहेत किंवा ज्या बातम्या पाहायला आपल्याला आवडतील अशा मोजक्याच बातम्या टीव्हीवरून दाखविल्या जातात." म्हणजे उदाहरणार्थ श्रीयुत मिकाजी यांनी श्रीमती राखीताई सावंत यांचे चुंबन घेतल्याची ब्रेकिंग न्यूज. टीव्हीवरून ती दाखविली जाते की नाही? बरे दाखवायची, तर ती एकदाच दाखवून कसे बरे चालेल? बघे प्रेक्षक काही वेळ ठरवून येत नाहीत. तेव्हा आल्याक्षणी त्यांना ते दृश्य दिसले पाहिजे. बरे फक्त एकदाच ते दृश्य दिसून कसे चालेल? तेव्हा ते पुन्हा पुन्हा दिसले पाहिजे. त्याशिवाय का वाचकांचा माहितीचा अधिकार पूर्ण होईल? व "प्रेक्षकाला चॅनेल लावल्या क्षणी खिळवून ठेवण्याची चॅनेलांची कर्तबगारी" सिद्ध होईल?
आता तुम्ही बालबुद्धीचे बघे प्रेक्षक वा रांगणारी बाळे असाल, तर तुम्हांस हा युक्तिवाद पटणारच नाही. तुम्ही म्हणाल, की एकच बातमी पुन्हा पुन्हा दाखविणे आणि एका बातमीत तीच ती क्लिप सतत दाखविणे आणि सांगण्यासारखे काहीही उरलेले नसतानाही तीच ती बातमी ताणताण ताणणे व प्रवाचकांनी शिरा ताण ताण ताणून बोलणे यांस तुमचा आक्षेप आहे. परंतु मित्र हो, तुम्ही स्वयंघोषित विचारवंत वगैरे असल्याने मुळातच तुम्हांस न्यूज चॅनेल कसा पहावयाचा, हेच ठावके नाही. तेव्हा मिलॉर्ड, राजीवश्रींनी उपस्थित केलेले तमाम मुद्दे मद्देनजर रखते हुए हे सर्व आक्षेप तद्दन भंपक व अज्ञानमूलक आहे, असेच आम्ही मानतो!
यानंतरचा दुसरा आक्षेप आहे, तो थिल्लरपणाचा. या आक्षेपारोपावर लिहिताना जणू राजीवश्रींच्या हाती लेखणी नसून केरसुणीच होती. "२६ नोव्हेंबरच्या हल्ल्यानंतर तर रांगणारी बाळेसुद्धा चॅनेलवाल्यांना शहाणपणाचे डोस देत फिरु लागली आहेत," असा संतापमाझा व्यक्त करीत त्यांनी या रांगणा-या बाळांना चॅनेलविद्येचा पोलिओ डोसच दिला आहे. "धादांत खोटी विधाने आणि तद्दन भंपक आरोप" केल्यावर कोणीही संतापणारच! आपण नाही का, वृत्तवाहिन्यांवरील धादांत खोट्या बातम्या आणि तद्दन भंपक कार्यक्रम पाहून संतापतो! तसेच हे!!
पुढे पुढे तर राजीवश्रींना या संतापाचा ताप एवढा चढला, की त्या भरात ते चक्क "आपल्या मीडियाचे सगळेच बरोबर असते किंवा आहे, असे नाही. अजूनही उत्साहाच्या भरात काही चुका होऊन जातात," अशी कबुली देते झाले! त्यांचा संतप्तसवाल एवढाच, की चुका होतात, "पण म्हणून त्यांना किती बदडून काढायचे, याला काही मर्यादा?" हे बरीक बरोबर आहे! आम्हांस तर असे सुचते, की कोणत्या चुकीला किती बदडावे याचे काही तरी कोष्टक वा इंडियन च्यानेल कोड तयार करावयास हवे! दुसरी गोष्ट म्हणजे, च्यानेलांवर कोणी टिका करावी, याचेही काही मापदंड बनविले पाहिजेत. राजीवश्री लिहितात, की "त्या तीन दिवसांच्या काळात किंवा नंतरही सुरक्षा यंत्रणांनी मीडियाच्या भूमिकेविषयी कसलीही प्रतिकूल प्रतिक्रिया दिलेली नाही. टीकेचा खळखळाट सुरू होता, तो या सगळ्याशी ज्यांचा कसलाच संबंध नव्हता, अशी काही बघ्या प्रेक्षकांचा." हे अगदी व एकदम योग्य आहे! बघ्या प्रेक्षकांनी फक्त पाहावे! तुमचा काही संबंध असतो का बातम्यांशी? मग टीकेचा खळखळाट का बरे करता? राजीवश्रींनी येथे जो वैश्विक सत्याला हात घातला आहे, त्याने तर आम्हांस साक्षात् देवमाझाच आठवला! सामान्य जन्ता व आजकालचा मीडिया यांचा तसा काही जैविक संबंध राहिलेला नाही, हे आजकालचे सत्य संपादकाच्या केबिनीतून राष्ट्रापुढे मांडावयाचे म्हणजे काही टीव्हीवर फोनो द्यायचे काम नाही! त्यास हिम्मतच पाहिजे!!
बरें, ही कशाशीही संबंध नसलेली, बघे प्रेक्षक वगैरे रांगणारी बाळे नेहमीच इलेक्ट्रॉनिक मीडियाशी प्रिंट मीडियाची तुलना करतात. असा बाऊंसरमाझा आला, की आमुचे टीव्ही पत्रकार ब-याचदा बचावात्मक पवित्रा घेतात. अशा समरप्रसंगी टीव्ही पत्रकारांस गाण्डीवं संस्त्रते हस्तात् अशी स्थिती येते! परंतु या लेखोपनिषदातून राजीवश्रींनी जो गीतोपदेश केला आहे, त्यामुळे आता कोणत्याही टीव्ही पत्रकारास बूम टाकून पळण्याची वेळ येणार नाही! शिवाय "हल्लीचा प्रिंट मीडिया हा फार जबाबदारीने वागतो, असे म्हणण्याची सध्या तरी सोय नाही," असा पांचजन्य फुंकून राजीवश्रींनी या "पळपुट्या युक्तिवादा"तील हवाच काढून टाकली आहे, हे मान्यच करावयास हवे! कारण की इकडे जर इंड्या टीव्ही असेल, तर तिकडे वार्ताहर-पुण्यनगरी असतो व इकडे आयबीएन-वागळे असेल तर तिकडे सामना-प्रहार असतो, हे तर आपण पाहतोच!!
आपुल्या लेखमाझाच्या शेवटाकडे जाता जाता राजीवश्रींनी एक अत्यंत गंभीर मुद्दा मांडला आहे. ते म्हणतात, "ही (पक्षी - चॅनेलची) गुणवत्ता आणखी वाढली पाहिजे, हे नक्कीच. आपली चॅनेल्स आणखी प्रगल्भ झाली पाहिजेत, हे खरं." आता एवढं सगळं खरंखरं सांगितल्यावर ते पुढे म्हणतात, "पण त्यासाठी आपल्या प्रेक्षकांनीही टीव्ही चॅनेल्स कशी बघावी, हेही शिकलं पाहिजे."
या संपूर्ण च्यानेलबचाव-लेखातील, आमच्या कुपोषित मेंदूस न पचलेला मुद्दा आहे तो हाच. विचार करून करून आमुच्या मेंदूतील तमाम करड्या पेशी खतम झाल्या, किंतु आम्हांस हे समजले नाही, की प्रेक्षकांनी च्यानेल कसा पाहावा यावर च्यानेलांची प्रगल्भता कशी बरे अवलंबून आहे?
हे म्हणजे असे झाले, की प्रेक्षक गुटखा खावून पचापचा थुंकत काहीही बघतात म्हणून च्यानेले त्यांना तेच दाखविणार! किंतु मग च्यानेलांच्या जबाबदारीचे काय?
आणि प्रेक्षकांनी च्यानेल कसा पाहावयाचा याचे ज्ञानग्रहण करण्यासाठी कोणत्या विद्यापीठी जावे, अशी राजीवश्रींची अपेक्षा आहे?
स्टारमाझा 'च्यानेल पाहण्याची शाळा' वगैरे काढणार असेल, तर मात्र आमुचे काहीच म्हणणे नाही.
या विद्यालयात एक वर्ग 'च्यानेल कसा काढावा' याचाही असला म्हणजे झाले!
(Posted by बापू आत्रंगे, दि. ७ फेब्रु. २००९)
जे हत्ते लोकसत्तेच्या ठायी च्यानेल-ए-मसीहा राजीव खांडेकर यांनी एक शैक्षणिक लेख (न्यूज चॅनेल पाहायला शिका!) लिहिला आणि काय सांगू, आमुच्या तर नजरेसमोर स्टारच चमकले!
आमुचे जाऊ द्या! आम्ही आपुले अदनासे बोरूबहाद्दर! आमुच्या अकलेचे म्हणाल, तर व्हर्निअर कैवार वा स्क्रू मापी घेऊनच तिचे माप काढावे लागेल! तेव्हा आमुचे जाऊ द्या! पण त्या स्टारलेखाने "बालबुद्धीच्या नवशिक्या पोरासोरांपासून पांडित्याची झूल अंगावर पांघरून वावरणा-या विद्वतजनांपर्यंत" ऐशा समस्तांची अशी काही श्मश्रू केली आहे, की यंव रे यंव!
(बालबुद्धीची नवशिकी पोरंसोरं ऐसे सत्कारताना स्टार-ए-आझम राजीवजींच्या ज्ञानचक्षुंसमोर खचितच स्टारचे प्रवाचक नसणार! त्या स्टारसन्मानाचे मानकरी नक्की आम्हीच असणार! किंतु पांडित्याची झूल पांघरलेले विद्वतजन म्हणजे नेमके कोण ते काही आम्हांस उमगले नाही! कोण्या संपादकाने च्यानेलांवर टीका करणारा अग्रलेख कधी लिहिला होता काय? चौकशी करावयास हवी.)
ते काहीही असो. परंतु ही उपरोक्त मंडळी (पक्षी - बानपोसो व पांझुपांवि) व अन्य लोक (राजीवजी यांचा 'बघे प्रेक्षक' असा गौरव करतात!) यांच्या टाळक्यात राजीवजींनी बूम हाणला, ते बरेच झाले! "अर्धवट ज्ञानातून आलेली अज्ञानमूलक टीका" करायची म्हणजे किती करायची? त्यास काही प्रमाण? बानपोसो यांच्याकडे एकवेळ दुर्लक्ष करता येईल, पण पांझुपांवि हे सुद्धा उठसूट च्यानेलांवर टीका करतात म्हणजे काय? समजतात तरी कोण हे स्वतःला? स्टारमाझाचे अँकर?
बरें टीका व आक्षेप तरी काही ज्ञानमूलक असावेत ना! किंतु नाही. २६-११ पासून आम्ही ऐकतोय. तीच ती टीका आणि तेच ते आक्षेप! हे म्हणजे च्यानेलांवरील वृत्तदळणासम झाले! राजीवजी म्हणतात, "शक्य असते तर या मंडळींनी (पक्षी - बानपोसो व पांझुपांवि) चॅनेलवाल्यांना अंगठे धरून वर्गाबाहेर तरी उभे केले असते किंवा अरबी समुद्रात तरी नेऊन बुडवले असते!" (खरेच अशी काही आफत आली असती, तर किती हाहाकार माजला असता! कल्पना करा, की सनसनीचा सन्माननीय सादरकर्ता वर्गाबाहेर अंगठे धरून उभा असता, तर त्या वर्गावर जाण्याची वर्गशिक्षकांची तरी हिंमत झाली असती काय?) तथापि असे काही आता होणे नाही! कारण की स्टार-ए-आझम, च्यानेल-ए-मसीहा, बूमबहाद्दर राजमान्य राजेश्री राजीव खांडेकर यांनी आपल्या लेखणीच्या धारदार खांडाने या एकेका आक्षेपाचे राईराई एवढे तुकडे केले आहेत! टीकाकारांच्या अक्कल व समज व हुशारी व ज्ञान यांवरच थेट धावा बोलून त्यांचे शिरकाण केले आहे!
वास्तविक समस्त टीकाकारांना गारद केल्यानंतर राजीवजींची च्यानेलबचाव मोहिम फत्तेच झाली होती! या दिग्विजयानंतर स्टारमाझावरून भुईनळे व पाऊस व चिडिबार व आपटबार फोडावयास हरकत नव्हती! परंतु राजीवजींचा थोरपणा येथेच दिसतो! पत्रकार हा समाजाचा गुरु असतो (व त्यातील काही राज-गुरु आणि काही शिक्षणसेवक असतात), हे त्यांस नीटच माहित असल्याने, त्यांनी लगोलग प्रौढशिक्षणाचे राष्ट्रीय अभियानही हाती घेतले. त्या अंतर्गत बानपोसो व पांझुपांवि व बघे प्रेक्षक यांच्या आरोपांची शहानिशा करावयास घेतली. राजेश्री म्हणतात, "त्याने सारेच गैरसमज दूर होतील असे नाही. पण किमान हे माध्यम समजायला तरी मदत होईल."
तर वाचकांतील "बालबुद्धीच्या नवशिक्या पोरासोरांपासून पांडित्याची झूल अंगावर पांघरून वावरणा-या विद्वतजनांपर्यंत" समस्तहो,
राजेश्रींनी च्यानेलांवरील आरोपांची शहानिशा कशी केली?
च्यानेलांबाबतच्या गैरसमजांचे निर्दालन कसे केले?
हे माध्यम कसे समजून दिले?
याबाबतची उत्सुकता आपुल्या मनी दाटून आली असेल ना?
परंतु आपण त्याकडे पुढच्या एपिसोडी वळू.
तोवर गृहपाठ म्हणून कळते समजतेला भेट देऊन वाचा रा. रा. राजीव खांडेकर यांचा एज्युकेशनल लेख.
मागील लेख
-
▼
2009
(49)
-
►
January
(13)
- ब्लॉगची फुलली बाग!
- पौषसहलीचे कवित्व
- स्वातंत्र्य, संपादक आणि हाय हल्ला!
- कळते-समजते वाचलात?
- आमची साहित्यिक जबाबदारी
- पुन्हा एकदा (शॅडो) सकाळ!
- पुरस्कार जिवाला लावी पिसे...
- एका बातमीचे भजे!
- आमची शोधपत्रकारिता आणि बापूचा आत्रंगी आजार
- नावात काय असते?
- निवेदन
- पत्रपोळ्यानिमित्ताने मागे-पुढे वळून पाहताना...
- काही संकल्पचित्रे
-
►
January
(13)
कळते समजते
मीडियाविषयक पहिला मराठी बातमीब्लॉग
कळते-समजते
मीडियातील घटना आणि घडामोडींच्या बातम्यांसाठी...
याशिवाय यात आहेत
मराठी ऑनलाइन वृत्तपत्रे
महत्त्वाच्या पत्रांतील एडिट-ऑपेडवरील लेख
मीडिया विषयक खास लेख
आणि
मराठी पत्रकारांचे ब्लॉग्ज
या सगळ्यांच्या लिंक्स.
कळते-समजते!
सहयोगी बातमीदार
-
वागळे, आयबीएनवरील हल्ला आणि पत्रकारिता - साधारणत: दीड वर्षापूर्वी आयबीएन लोकमत सुरू झाले. त्यावेळी वागळे आणि सरदेसाई असे दोन दमदार चेहरे, वेगळे कार्यक्रम, नेमकेपणा इ. मुळे मीदेखील आयबीएनचा फॅन झा...3 days ago
Live Traffic Feed

This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-Share Alike 3.0 Unported License.
A-Cidic
Communications, Mumbai
(ए-सिडिक कम्युनिकेशन्स,
मुंबई)
Mail to - blogeditor.acidic@gmail.com


