वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्य हो,
आम्ही हाडाचे पत्रकार नसलो, तरी बातमी हा आमच्या चर्वणाचा एक विषय आहे.
आपण हे पाहतोच आहोत की अलीकडे वाहिन्यांमुळे वृत्तपत्रांची मोठी कुचंबणा झाली आहे.
शिळ्या, वाहिन्यांनी चघळलेल्या बातम्या देणे हे काही वृत्तपत्रांतील लोकांना फार आवडते असे नाही.
आता यावर काही उपाय आहे का?
आम्हांस हे माहित आहे, की आपल्यांतील अनेकांना हा प्रश्न सतावतो आहे. अनेकांनी यावर आपल्या परीने उत्तरे शोधली आहेत. अनेक जण यावर सातत्याने बोलत आहेत.
आमच्या चांगदेव पाटलांनीही यासंदर्भात काही मुद्दे मांडले आहेत.
आजच्या दिवशी अंमळ गंभीर होऊन आपण त्यांचा विचार करूया. (एरवी मग आपली भंकस चालूच असते की!)
तेव्हा वाचा - बदलती बातमी
आपली मते आणि प्रतिक्रिया जरूर पाठवा.
बदलती बातमी
- चांगदेव पाटील
दूरचित्रवाणीवरील वृत्तवाहिन्यांची स्पर्धा तर स्पष्टच दिसते आहे. पण त्या स्पर्धेला तोंड कसे द्यायचे, कोणत्या हत्यारांनी लढायचे याचा अंदाज काही येत नाही, असे काहीसे मराठी वृत्तपत्रांचे झाल्याचे दिसत असून, त्यामुळे एकंदरीतच सर्व वृत्तपत्रे कुचंबल्यासारखी दिसत आहेत.
वृत्तवाहिन्यांशी स्पर्धा करायची म्हणजे वृत्तवाहिन्यांसारखेच दिसायचे असा काहीसा गैरसमज काही वृत्तपत्र-चालकांचा व संपादकांचा झाल्याचे दिसत आहे. वृत्तपत्रे रंगीत झाली, त्यात मोठमोठी रंगीत छायाचित्रे प्रसिद्ध होऊ लागली हे तांत्रिक प्रगतीमुळे झाले हे मान्यच. परंतु असे करण्याची निकड आली ती वृत्तवाहिन्यांच्या स्पर्धेमुळेच. हे केवळ दृश्यात्मकतेपुरतेच मर्यादित राहिले असे नव्हे. पहिल्या पानावरील बातम्यांच्या निवडीपर्यंत हा परिणाम झालेला आहे. अन्यथा, आरुषी हत्याप्रकरणासारखी बातमी एरवी मराठी वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर कधीही येऊ शकली नसती. खड्ड्यात पडलेल्या प्रिन्सच्या बातमीचे उदाहरण तर या संदर्भात कायम लक्षात राहण्यासारखे आहे. ब्रेकिंग न्यूज या प्रकाराने तर मराठी वृत्तपत्रांतील ताजेपणाच हरवून गेला आहे.
दूरचित्रवाणी आणि त्याचबरोबर इंटरनेट ही माध्यमे प्रचंड डायनॅमिक आहेत. हे या माध्यमांचे एक बलस्थान आहे. कोणतीही बातमी घडताक्षणी ती वाचक-प्रेक्षकांसमोर आणण्याची या माध्यमांची क्षमता, दर चोवीस तासांनी अपडेट होणारी वृत्तपत्रे कधीही गाठू शकणार नाहीत.
वृत्तवाहिन्यांनी दिवसभर एखाद्या बातमीचे दोहन करून त्या घटनेचा चोथा केल्यानंतर दुस-या दिवशी सकाळी तमाम वृत्तपत्रांनी ती मुख्य बातमी म्हणून मुखपृष्ठावर छापावी, यात काय अर्थ आहे तो त्या संपादकांनाच ठाऊक. पण हा वाचकाच्या वेळेचा, पैशाचा, वृत्तपत्रांच्या किमती कागदाचा अपव्यय आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे ते पत्रकारिता या व्यवसायाच्या विपरीत आहे.
यावर आमचे काही मित्र असा युक्तिवाद करतात, की असे जर असेल, तर मग वाचक क्रिकेटच्या बातम्या कशा रस घेऊन वाचतात?
बरोबरच आहे. आदल्या दिवशी क्रिकेटचा सामना पाहिल्यानंतर दुस-या दिवशी तेच लोक क्रिकेटच्या बातम्याही आवर्जून वाचतात. पण कशासाठी? तो सामना कोणी जिंकला हे जाणून घेण्यासाठी? त्या सामन्यात किती धावा झाल्या याची माहिती घेण्यासाठी? वाचक वाचतात ते पुनःप्रत्ययाच्या आनंदासाठी, त्या सामन्याच्या रसग्रहणासाठी. हेच इतरही अशाच काही बातम्यांच्याबाबतीत घडते. वृत्तपत्रे अजाणता ते देतात, म्हणून लोक वाचतात.
आणि यातच खरे तर वृत्तपत्रांच्या सुटकेचा मार्ग आहे. बातमी पुढची बातमी. आज घडलेल्या बातम्या आजच वृत्तवाहिन्या आणि इंटरनेट देतील. तुम्ही उद्या त्या बातमीच्या पुढची बातमी देऊ शकता. त्या बातमीमागची बातमी सांगू शकता. बातमीचे विश्लेषण करू शकता. विश्लेषण हा तर खास वृत्तपत्रांचा आणि वेबसाईट्सचा प्रांत होऊ शकतो.
चलत् चित्र हे वृत्तवाहिन्यांचे बलस्थान आहे, तसीच ती त्यांची कमजोरीही आहे. ज्या बातम्यांमध्ये व्हिडिओची शक्यता नाही, अशा बातम्या वृत्तवाहिन्यांसाठी अयोग्यच ठरतात. त्या दिल्या जात नाहीत, असे नाही. पूर्वी - खरे तर आजही - आपली सह्याद्री वाहिनी अशाच बातम्या देते. अनेकदा अशा कोरड्या बातम्या देण्याशिवाय वृत्तवाहिन्यांना गत्यंतर नसते. पण तो त्यांचा नाईलाजाचा भाग असतो. आणि म्हणूनच याचा लाभ वृत्तपत्रे घेऊ शकतात. जेथे वृत्तवाहिन्या जाऊ शकत नाहीत, तेथे वृत्तपत्रे जाऊ शकतात.
खरे तर यात नवे काहीच नाही. आपल्या मराठी वृत्तपत्रांना याची जाणीव नाही, असेही नाही. लोकसत्ता आणि काही प्रमाणात सकाळ या वृत्तपत्रांना हे चांगलेच समजले आहे. याचा अर्थ लोकसत्ता किंवा सकाळ मध्ये नेहमीच्या, वाहिन्यांनी चघळलेल्या बातम्या येत नाहीत असा नाही. पण अनेकदा ही वृत्तपत्रे त्याही पलीकडे जाण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसते. पुणे सकाळमधील काही पत्रकार मित्रांशी बोलल्यानंतर, त्यांनी एक संस्था म्हणून याचा खूपच विचार केलेला आहे, हे दिसले. 'एटी पर्सेंट डिफरन्ट' हे कार्यसूत्र म्हणून सकाळने स्वीकारले आहे. याचा अर्थ अन्य वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांहून ऎंशी टक्के वेगळा मजकूर सकाळ देणार. तसे सदा होत नाही आणि तेथे अनेक चांगल्या कल्पनांचा अंमलबजावणीच्या पातळीवर विचका केला जातो, हा भाग अलाहिदा. पण त्यांचा प्रयत्न तरी तो असतो.
लोकसत्ताने वृत्तलेखनाच्या पद्धतीत जाणीवपूर्वक की अजाणता ते माहित नाही, पण खूपच बदल केला असल्याचे दिसून येते. सविस्तर बातमी हे लोकसत्ताचे वैशिष्ट्य. पण आता तेथे वृत्तलेखांनाही पहिल्या पानावर जागा दिली जाते. सकाळमध्ये नेमके याच्या उलट. वाचकांजवळ वेळ नाही म्हणून दहा मिनिटांत बातम्यांसारखा प्रयोग केल्यानंतर पुन्हा बाकीच्या बातम्या त्रोटक, कमी शब्दांतच दिल्या जाव्यात हा सकाळचा हट्ट समजण्यापलीकडचा आहे.
बातमी ही पवित्र असते, त्यामुळे त्यात मते येता कामा नयेत, हा पत्रकारितेचा पहिला पाठ. पण लोकसत्ताने आता त्याकडे पूर्ण पाठ फिरवली आहे. व त्यात काही गैर आहे, असे मानण्याचे कारण नाही. तुमची बातमी देण्यातील एकाधिकारशाही संपल्यानंतर व खरे तर इतर साधनांमुळे ते तुमच्या अस्तित्वाचे मुलभूत प्रयोजनच न उरल्यानंतर, बातमीचे पावित्र्य या गोष्टीला काही अर्थच उरत नाही.
वाचकाला कोरडी बातमी द्या व त्याला तिचा अन्वयार्थ लावू द्या, असे सांगणारे एक स्कूल पत्रकारितेत अद्याप आहे. वाचकाला तितका वेळ आहे आणि त्याची तितकी समज आहे, हे या स्कूलने कोठेतरी गृहीत धरलेले असते. परंतु आता परिस्थिती पालटली आहे. वाचक सूज्ञ आहे आणि त्याच्याकडे खरेच वेळ नाही. त्यामुळे बातमीत मते आली, तर त्याला ती हवीच आहेत. ती मते त्याला पटली नाही, तर ती तो फेकून देऊ शकतो अथवा वृत्तपत्रच बदलू शकतो. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की वाचकाची वृत्तपत्राप्रती जी निष्ठा असते, ती बातम्यांमुळे ठरत नाही. ती ठरते ती त्या वृत्तपत्राच्या धोरणांमुळे, मतांमुळे. हे धोरण, हे मत बातमीत आल्यास त्यामुळे बातमीचा विनयभंग होतो असे समजण्याचे कारण नाही.
वृत्तपत्रांना वृत्तवाहिन्यांच्या स्पर्धेत ठाम टिकायचे असेल, तर अशा बदलांचा अंगिकार करावाच लागेल.
(Posted by बापू आत्रंगे, दि. २० मार्च २००९)
11 comments
Changdeva,
Lihilayas chachan, pan sakalchya batmisarkhach, korde, thanthanit.
How many viewers view News channels, what is the percentage, leave aside rural viewers, even in urban areas people seldom stick to news channels (journalsits and news papers exception) Someone has rightly said that many a times TV medium is the advertiser of next days newspaper. An item on front page of Loksatta sings the tune of this or that party while inside item contradicts it. Have you observed?
मला असे वाटते की, लेखकाने उपस्थित केलेला मुद्दा जरी योग्य असला तरी लेखकाला बहुधा दृकश्राव्य माध्यमाचे आकलन तितकेसे नसावे. त्यामुळेच मग अन्य पत्रकारांप्रमाणे सरधोपट वृत्तवाहिन्यांवर कमेंट केली आहे. कृपया आपण आपली नोकरी वर्तमानपत्रात करतो हे विसरू नये...आणि वृत्तवाहिन्यांवर अधिकारवाणीने बोलण्याआधी त्या माध्यमात किमान एक महिना तरी काम करावे. या माध्यमाची ताकत समजून घ्यावी. एकदा कॅमेराची आणि एकूणच या माध्यमाची ताकत कळली की अशा टेबलावर बसून आणि केवळ स्वतःच्या तर्काने लिखाण होणार नाही.
मला असे वाटते की, लेखकाने उपस्थित केलेला मुद्दा जरी योग्य असला तरी लेखकाला बहुधा दृकश्राव्य माध्यमाचे आकलन तितकेसे नसावे. त्यामुळेच मग अन्य पत्रकारांप्रमाणे सरधोपट वृत्तवाहिन्यांवर कमेंट केली आहे.
या अनामवीराच्या टीकेबद्दल आमचे चांगदेव पाटील लिहितात -
मित्रा, येथे मुद्दा वृत्तवाहिन्यांचा नाही, हे आपल्या लक्षात आलेले दिसत नाही. आणि आपल्या माहितीसाठी - टीव्ही माध्यम मी अनुभवलेले आहे. त्यामुळे किमान कॅमेरा म्हणजे काय हे तरी मला माहित असण्यास आपली हरकत नसावी.
वाहिन्यांवर टीका करणारा पत्रकार म्हणजे त्याला टीव्हीची माहितीच नाही असे समजण्याची ही प्रथा कुठून आली कुणास ठाऊक?
nice!
the article opens new horizons. and new debate on concept `sacred of news`. spl. last 2 paras. thanx bapu. and thanx also to changdev!
Someone has rightly said that many a times TV medium is the advertiser of next days newspaper.
अगदी रास्त. माझे म्हणणे एवढेच, की वृत्तपत्रांनी वाहिन्यांवरून मोठा गाजावाजा झालेल्या बातम्यांच्या पलीकडे जाण्याची गरज आहे.
उद्या स्थानिक वाहिन्या आल्या (वाहिन्यांच्या आवृत्त्या. ऑल्विन टॉफ्लरच्या भाषेत डिमासिफिकेशन.) तर आज वाहिन्यांच्या आवाक्याबाहेरील बातम्याही तेथे येतील. तेव्हा मग वृत्तपत्रांनी काय करावयाचे हा मूळ प्रश्न आहे.
- चांगदेव पाटील.
वृत्तपत्रांचे स्थान हे कायम राहणार आहे. याचे कारण म्हणजे बहुसंख्य जनतेला २४ तास टीवी बघायला वेळ नाही आणि इंटरनेट अजुन सर्वव्यापी व्हायला अवकाश आहे. दुसरी गोष्ट म्हणजे वाचकाचे मत. अजुन पेपर वाचून मत बनवणारे आहेत. आणि ते ग्रामीण भागात जास्त आहेत. एकतर परावरचे राजकारण आणि सत्तेचे केन्द्र हे दोन्ही ग्रामीण भागात आहेत.
राहिला प्रश्ना वाहिन्यांचा ! त्याना "Breaking News" पक्षी : शनी आणि राहूची टक्कर, सलमान आणि आमिर चा वाद आणि तत्सम प्रकारांमधून वेळ नाही !
वृत्तपत्रांपुढे खरे आव्हान आहे ते पैश्याचे आणि निष्पक्षपातिपणा टिकवून धरण्या चे. ते पेलले तर काळजीचे काम नाही. पूर्वीसुद्धा रेडियो आणि टीव्ही होतेच की. आता ते फक्त २४ तास चला तात एवढाच काय तो फरक !
बापू, चान्गदेवाने खरोखरच तद्दन गंभीर लेख लिहिला आहे. हे विडम्बनाचे व्यासपीठ आहे. हे तो विसरला काय?
bapu sarvapratham tumche aani changadevanche khup khup aabhar. batmidarchya madhamatun nirman zalelya ya vyaspithavar vidambana barobarach vichar karayala lavnare lekhan hot aahe.mage kahi divasapurvi ma. ketkar sarani badaltya batmidari vishyi bhashya kel hot, changdevanch badaltya batmidari vishaich nat agadi rast aahe. ya lekhachya madhmatun konavar tika karne ha uddesh nahi tar badalatya batmidarich wastav niriksahn aahe aas mala watat, yavar mat matantare aasu shaktil aani tech ya lekhakala aapekshit aahe aas watat.
despite challanges from new media, indian newspaper industry is growing. Its circulation is on rise. New concepts are conceptualised and introduced in print media as it needed. New invention takes place. This is happening all the time. so what's new in it ? the important thing is rich content and its presentation. serious journalism never die.
Post a Comment
मागील लेख
-
▼
2009
(49)
-
►
January
(13)
- ब्लॉगची फुलली बाग!
- पौषसहलीचे कवित्व
- स्वातंत्र्य, संपादक आणि हाय हल्ला!
- कळते-समजते वाचलात?
- आमची साहित्यिक जबाबदारी
- पुन्हा एकदा (शॅडो) सकाळ!
- पुरस्कार जिवाला लावी पिसे...
- एका बातमीचे भजे!
- आमची शोधपत्रकारिता आणि बापूचा आत्रंगी आजार
- नावात काय असते?
- निवेदन
- पत्रपोळ्यानिमित्ताने मागे-पुढे वळून पाहताना...
- काही संकल्पचित्रे
-
►
January
(13)
कळते समजते
मीडियाविषयक पहिला मराठी बातमीब्लॉग
कळते-समजते
मीडियातील घटना आणि घडामोडींच्या बातम्यांसाठी...
याशिवाय यात आहेत
मराठी ऑनलाइन वृत्तपत्रे
महत्त्वाच्या पत्रांतील एडिट-ऑपेडवरील लेख
मीडिया विषयक खास लेख
आणि
मराठी पत्रकारांचे ब्लॉग्ज
या सगळ्यांच्या लिंक्स.
कळते-समजते!
सहयोगी बातमीदार
-
वागळे, आयबीएनवरील हल्ला आणि पत्रकारिता - साधारणत: दीड वर्षापूर्वी आयबीएन लोकमत सुरू झाले. त्यावेळी वागळे आणि सरदेसाई असे दोन दमदार चेहरे, वेगळे कार्यक्रम, नेमकेपणा इ. मुळे मीदेखील आयबीएनचा फॅन झा...3 days ago
Live Traffic Feed

This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-Share Alike 3.0 Unported License.
A-Cidic
Communications, Mumbai
(ए-सिडिक कम्युनिकेशन्स,
मुंबई)
Mail to - blogeditor.acidic@gmail.com

