आत्ताच 'तारतम्य' वाचून आल्यासारखे सगळ्यांचे चेहरे दिसत होते. गंभीर. चिंताक्रांत. प्रत्येक जण आपल्याच विचारात मग्न होता. वाचक हो, कसला बरे विचार करीत असतील ते? महाराष्ट्रातील उदारमतवादी परंपरेला कोणते बरे ग्रहण लागले, असा का विचार करीत असतील ते? काय सांगावे? कदाचित दुसरा काय विचार करतोय याचाच विचार ते करीत असतील? दोन पत्रकार एकत्र आले की हेच घडते! येथे तर मराठी पत्रकुलातील अनेक कुलपती एकत्र आले होते.

वाचक हो, मराठीतील अनेक संपादक असे एकत्र बसून विचार करत आहेत, हे दृश्य पाहून आम्ही अगदी मोहरून गेलो. मनीं हरिभाऊ गोखल्यांची कविता उमटली - ये ये ताई पहा पहा, गंमत नामी किती अहा!

वाचक हो, मराठी आजी-माजी संपादक एकत्र येऊन विचार करीत आहेत. परंतु हा दुर्मिळदुर्घट कर्मयोग ते का बरे करीत आहेत, हे आपण तेथेच जाऊन जाणून घेऊ या.

वाचक हो, दैवाची गती न्यारी असते! या गतीमुळेच हरिभाऊंच्या 'गड आला पण सिंह गेला' मधील कमलकुमारी उदेभानास ओळखू शकली नाही. अगदी त्याचप्रमाणे आम्हीही या संपादकांस ओळखू शकलो नाही. कारण की आम्ही तर पडलो अदनासे पत्रबारगिर. आम्हांस लेखणीची तरवार चालविणा-या आजी-माजी पत्रसेनानायकांची कोठून बरे ओळख असणार. तेव्हा वाचक हो, आपण अंदाजानेच त्यांची ओळख लावून घेऊ या. ती ओळख योग्य असेलच असे नाही. तरी पण चला तर...

-------------------------------------------------------------

ते पहा, ते संपादक बोलत आहेत. बोलत आहेत. बोलतच आहेत.
"वृत्तपत्रांवर पूर्वीपासूनच हल्ले होत आहेत. माझ्यावर तर अनेकदा हल्ले झाले. परंतु मी डगमगलो नाही. परंतु हे कोठेतरी रोखण्याची गरज आहे असे तुम्हांला वाटत नाही का? आपल्याकडे येथे राऊत आहेत. मी त्यांच्याकडे वळणारच आहे. पण त्याआधी मी घेतो एक ब्रेक..." असे म्हणत त्यांनी पाण्याचा पेला ओठांस लावला. बोलून बोलून त्यांचा घसा दुखला असावा. घसा दुखत असला, तरी ते निश्चितच कुमार केतकर नव्हते. (घसा बसल्याने ते बैठकीला आले नव्हते.) तेव्हा वाचक हो, ते नक्कीच मीखिल वागळे (पक्षी - निखिल वागळे) असणार. त्यांनी ब्रेक घेतला म्हणून निश्वास नका टाकू! ते लगेच परत येणार आहेत!

"महाराष्ट्रात न्यायमूर्ती रानडेंनी रुजवलेली उदारमतवादाची परंपरा लुप्त होत चालली आहे, असा याचा अर्थ असला, तरी वृत्तपत्रांनीही आपली जबाबदारी ओळखून वागणे सद्यपरिस्थितीत आवश्यक आहे, असे आमचे ठाम मत आहे." हे डॉक्टर टिकेकरच. न्या. रानडे, उदारमतवाद, सद्यस्थिती हे सगळे आले म्हणजे ते डॉक्टर टिकेकरच असणार.

"पण मुद्दा असा आहे, की वृत्तपत्रांनी कुणावर अशी टिका करावीच का? त्यांना अन्य विषय नाहीत का? पुण्यातला बीआरटीचा प्रश्न केवढा गंभीर आहे! त्यावर लिहावे... आमचा जागर हल्ली बंद आहे. पण आम्ही लवकरच सप्तरंगमध्ये सदर सुरु करणार आहोत..." आनंदरावांशिवाय हे दुसरे कोण बोलणार? गेली दोन वर्षे ते सदर लिहिण्याचा विचार करीत असल्याची पुण्यात अफवा आहे.

"हे पाहा, नवाकाळने जे लिहायचे ते लिहिले. पण म्हणून त्यांच्यावर हल्ला व्हावा? ही लोकशाही आहे की मोगलाई? विचारांचा मुकाबला विचारानेच झाला पाहिजे. वृत्तपत्रस्वातंत्र्याला नख लावणा-या या औरंगजेबी प्रवृत्तींना जागीच ठेचले पाहिजे." संजय राऊत हे म्हणाले मात्र. बैठकीत एकदम सन्नाटाच पसरला. वागळेंना तर ठसकाच लागला. त्यांच्या डोळ्यांसमोर महानगरच्या फुटलेल्या काचांचे ढीग उभे राहिले!

"परंतु लिहिताना सभ्यतेचे काही नियम पाळायला हवेत की नकोत? सुपारीबाज लिहिल्यानंतर कोणी चिडले, तर त्याची जबाबदारी कोणाची?" हा प्रहार आल्हाद गोडबोलेंचा. हे बोलताना त्यांना एकदम ऍसिडिटी वाढल्यासारखे वाटले! मग ते शांत झाले.

"राऊतसाहेब, ते सगळं जाऊ द्या... पण त्या हल्ल्यानंतर तुम्ही नवाकाळमध्ये नेमके कशासाठी गेला होता हो?" जीभेच्या टोकाने पानपरागचा कण उडवित प्रवीण टोकेकर यांनी सहज विचारले. परंतु वाचक हो, टोकेकरांची सहजताही कधीच सहज नसते. याची कल्पना राऊतांना पुढे येणार होती.

"कशासाठी म्हणजे?" राऊत.

"नाही म्हणजे, तुम्ही हल्ला झाला म्हणून निळूभाऊंच्या समाचाराला गेला होता, की या हल्ल्यातून शिवसैनिकांना काही शिकता येईल का हे पाहायला गेला होता?... नाही म्हणजे नेमका तथ्यांश काय तुमच्या भेटीचा?"

यावर राऊत काही तरी रोखठोक बोलणारच होते, तोच दुस-या राऊतांनी म्हणजे भारतकुमारांनी आपला दृष्टिकोन मांडला.
ते म्हणाले, "मटानायक उद्धवजी यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेने अद्याप कोणत्याही वृत्तपत्रावर हल्ला केलेला नाही...." मग बराच वेळ ते उद्धवजींवर बोलले. अफझल गुरु, नरेंद्र मोदी, गोध्रा, ओबामा, मायावती असे सगळे विषय बोलून झाल्याची खात्री झाल्यावर ते थांबले. मग पहिल्या राऊतांना बोलायला काही विषयच राहिला नाही!

"हे पाहा, नवाकाळने अग्रलेख लिहिला. परंतु त्यानंतर राणे यांनी रडीचा डाव खेळला असे आमचे स्पष्ट मत आहे." वागळे म्हणाले व यावर प्रेक्षकांचा काही कौल आला आहे का, हे आपल्या (म्हणजे टीव्ही एटिनच्या) ब्लॅकबेरीवर पाहू लागले.
"रडीचा डाव म्हणजे? बोलायचे ते स्पष्ट बोला." गोडबोले उसळले. उसळणे भागच होते त्यांना!

"मी इतकी वर्षे पत्रकारीतेत आहे. परंतु शिरिष पारकरांशिवाय मला असं कोणीही म्हणालेलं नाही. स्पष्ट बोलायला मी कुणाच्याही एक्सएक्सला घाबरत नाही... हा शुद्ध एक्सएक्सएक्स आरोप झाला.." वागळे तडतड बोलू लागले. त्यांना वाटले, 'आजचा सवाल'च सुरु आहे.

"अहो गोडबोले, मी सांगतो रडीचा डाव म्हणजे काय ते... भाऊंनी अग्रलेख लिहिला. त्याला राणेंच्या समर्थकांनी उत्तर दिलं. म्हणजे फिट्टमफाट झाली. पण त्यानंतरही राणेंनी प्रहारमध्ये लेख लिहिला. हा रडीचा डाव नाही काय?" टोकेकर पानपरागची पुडी फोडत म्हणाले. तेव्हा त्यांच्या डोळ्यांत नेहमीचे मिश्किल हास्य होते.

"ही सर्व उदारमतवादी परंपरेच्या अस्ताची लक्षणे आहेत..." डॉक्टर सारखे आपल्याच निदानाकडे येत होते.

"अहो पण वृत्तपत्रांनीही लिहिताना काही भान राखले पाहिजे ना..." पुन्हा गोडबोले बोलले. त्यांना बोलणे भाग होते!

"काय भान राखायचे? हे सगळे राजकीय नेते त्याच लायकीचे आहेत... आणि वृत्तपत्रेसुद्धा. आमच्यावर हल्ला झाला तेव्हा आले होते कोणी?"

"एकदा भारतभरातले संपादक आले होते ना तुमच्या पाठीशी उभं राहायला? इथं नवाकाळवर हल्ला झाला तेव्हा त्यांना भेटायला दीडच संपादक गेले होते... एक संजय राऊत. हे पूर्ण संपादक आणि राज ठाकरे हे अर्धे संपादक! त्यांचा पेपर अजून निघायचाय ना!!" टोकेकर. त्यांच्यातल्या ब्रिटिश नंदीची शिंगे अशी अधूनमधून दिसतात.

"अहो, पण आपल्या चर्चेचा मूळ मुद्दा काय आहे?" दिनकर रायकरांनी तोंडातली जांभई आतच जिरवत विचारले. अनेक संपादकांप्रमाणेच तेही आतापर्यंत गप्पगप्पच होते.

"काय आहे मूळ मुद्दा?" वागळेंनी विचारले.
"मूळ मुद्दा... काय आहे तो?" राऊतांचा रोखठोक सवाल.
"हो हो... काय आहे मूळ मुद्दा?" भारतकुमारांच्या दाढीआडही प्रश्नचिन्ह होते.
वाचक हो, बहुधा सगळेच मूळ मुद्दा विसरले होते.

"हे पाहा, वृत्तपत्रांवरील वाढत्या हल्ल्यांचा निषेध करून, सरकारने त्याविरोधात ठोस कारवाई करावी व हल्लेखोरांना शिक्षा करावी अशी मागणी करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत, असा माझा समज आहे." एका दमात एवढे मोठे वाक्य डॉक्टरच म्हणू व लिहू शकतात.

"ठिक आहे. करा निषेध." राऊत म्हणाले व राऊतांनी त्यास अनुमोदन दिले. हल्ल्यामागे काही शिवसैनिक नव्हते. तेव्हा निषेधास काहीच हरकत नव्हती.

"पण वृत्तपत्रांच्या भाषेचे काय?" टोकेकरांनी मध्येच पिन मारली.

"बरोबर आहे. सुपारीबाज भाषेत लिहिणारांचाही निषेध केला पाहिजे." गोडबोले म्हणाले. म्हणणे भागच होते!

"ठिक आहे. आपण असा ठराव करू या, की अभद्र, असभ्य भाषेत अग्रलेख वा बातम्या, तसेच श्लीलतेच्या मर्यादा ओलांडणारी छायाचित्रे वा व्यंगचित्रे प्रसिद्ध करणा-या वृत्तपत्रांचा आणि त्यामुळे त्यांच्यावर हल्ला करणा-यांचा आम्ही निषेध करीत आहोत." हातातील धुम्रकांडीचा जोरदार झुरका घेत डॉक्टर म्हणाले. एक कागद घेऊन त्यांनी आपल्या सुवाच्चसुंदर अक्षरात हा निषेधाचा मसुदा लिहून काढला.

"चला, तर मग यावर करा सह्या..." असे म्हणत त्यांनी वर पाहिले.

पाहतात तो काय?
सगळे संपादक गायब!

-------------------------------------------------

वाचक हो, आता त्या खोलीमध्ये फक्त डॉक्टर टिकेकर, आनंद आगाशे आणि सिगारेटचा धूर उरला होता!

(Posted by बापू आत्रंगे, दि. २४ जाने. २००९)

This entry was posted on 24.1.09 at 14:20 . You can follow any responses to this entry through the comments feed .

5 comments

भंकस  

आणि त्या धूरामागे आमची तत्त्वनिषठ पत्रकारिता जळताना दिसत होती. सामाजिक सुधारणा आणि लोकशिक्षणासाठी पत्रकारिता हा मराठी पत्रकारितेचा मूळ आत्मा आम्हाला जळताना दिसत होता. त्या धुराच्या लोटातही आम्हाला राजकीय नेत्यांच्या प्रतिमा दिसत होत्या. धुराच्या वेगवेगळ्या वार्तुळांमध्ये वेगवेगळे नेते दिसत असले तरी त्यांना जोडणारा धूर एकच होता. आणि अर्थातच त्याचा शेवट संपादकांच्या तोंडाशी होताना दिसता. आम्ही या धुरात अडकलो असताना बाहेर धावा धावा , पळा पळा, हाणा मारा असा आवाज आला. तेव्हा लक्षात आलं की, हा आणखी एक हल्ला झाला. असो. ....
बापू भट्टी पुन्हा चांगली जमली बरका... आजारपणातून खडखडीत बरे झाला दिसताय.
भंकस

January 24, 2009 3:08 PM
केशव कुंथलगिरीकर  

बापू, झकास रंगली हं मिटिंग....

`वर्षा` ची गाडी हुकली...वेळ आमची चुकली
हाश्शहुश्श करेस्तोवर काळा ने केली चुगली !
`प्रहार` आमचा घाव परका हा सामना कसला?
किल्ली फिर्ता तिकडे, इकडे उद्धव का हासला..?

January 24, 2009 5:20 PM
Anonymous  

शॉलीट बापू, बोले तो एकदम आँस्कर विनर पोश्ट.

चौदा नामांकने घेऊन टाका याला.


केतकरांचा आवाज खरंच बसलेला दोन- चार दिवसांपूर्वी . ही मीटिंग खोटी असल्याचं तुम्ही काल्पनिक चित्र रंगवताय.जर खरोखरीच हे एकत्र आले असते तर त्यांनी असंच काहीसं केलं असतं. थोर निरीक्षण आहे तुमचं आणि कसला संचार ?

January 25, 2009 1:42 AM

रा. रा. भंकस, अनामवीर,
स.न.वि.वि.
आपली कॉमेन्ट पोचली. मजकूर समजला. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
आपला,
बापू.

मिस्टर केशव कुंथलगिरीकर,
राव तुम्ही तर थोरच वात्रटिकाकार निघालात.
आम्ही तुम्हाला काय द्याचं बोला?
असो.
तुमच्या आणखी वात्रटिका वाचायला आम्हाला तर आवडतीलच, पण आपल्या वाचक मित्रांनाही आवडतील. सहयोगी बातमीदार तुमची वाट पाहतोय.
- बापू.

January 25, 2009 7:55 AM
केशव कुंथलगिरीकर  

बापू, आभारी हौत..

January 25, 2009 9:45 AM

Post a Comment