पडू आजारी ही मौज वाटे भारी वगैरे कवितेत ठिक असते. परंतु आपली (आधीचीच तोळामासा) प्रकृती जेव्हा बिघडते, तेव्हा काय काय मौज येते, हे ज्याचे त्यास ठावे! आमुच्या वाचकांनी मात्र आमचा आजार भल्ताच एन्जॉय केला. आमच्याकडे पोचविण्यात येत असलेल्या प्रतिक्रियांवरून ते भलेच कळत-समजत होते. एक वाचक (वाचक कसला, जन्माचा वैरीच तो!) तर आमचाच चहा फुरकावत आम्हांस सांगत होता, की बापू, तुम्ही कश्शाची म्हणजे कश्शाची काळजी करू नका! बातमीदार 'आता' चांगला निघतोय!!...

आमच्या आजारावर कोणा बन्या बेरकी वाचकाने स्टिंगॉपरेशनही केले म्हणे!
(म्हणून आम्ही कोणा पत्रकारास घरी नेत नाही! घरी नेले, की त्यांच्या अंगात जणू आदेशभाऊ बांदेकरच संचारतात. इतका वैनी-वैनी म्हणून पाघळ लावतात, की कालांतराने आपणांस शंका यावी, की आपली बायको ही आपली बायको नसून आपली वहिनी आहे!) असो.

आम्ही लौकर बरे व्हावे यासाठी महाराष्ट्रातीलच नव्हे, तर जगभरातील कोट्यवधी वाचक देव पाण्यात बुडवून बसले होते, असा भ्रम व्हावा इतके काही आम्ही तापग्रस्त नव्हतो! पण ज्या थोड्याफार वाचकांनी, पत्रकारांनी आम्हांस शुभेच्छा दिल्या, त्यांचे आम्ही शतशः ऋणी आहोत! (आजारपणातून उठल्यावर माणूस किती भाऊक होतो नाही!!) हेही असो.

या सुटीच्या प्रदीर्घ कालखंडातही आम्ही वृत्तपत्रे वाचतच होतो. (तुम्हांस सांगतो, बालपणी कधी तरी पायाखाली हा कागद येतो आणि त्याच्याशी आपले जे नाते जडते ते कायमचे! फरक येवढाच पडतो, की पायाखालचा कागद हातात येतो!!) वृत्तपत्रांचे वाचन-मनन-चिंतन हे आमचे आनंदसाधन आहे. (शिवाय त्यातच आमचे वेतन सामावले आहे!) परंतु वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष आणि अन्य हो, गेल्या काही दिवसांतील विविध वृत्तपत्रे वाचताना आम्हांस कमालीचा त्रास होत होता...

वास्तविक आम्ही इंड्या टीव्ही पाहू शकतो. साम मराठीवरील बातम्या ऐकू शकतो. (काही नतद्रष्ट सामला सकाळचा प्रभात असे म्हणतात! दुष्ट कुठचे! संजीवजी लाटकर, त्यांना किनई आपण पांडव कार्यक्रम पाहायला लावू हं!) आम्ही आयबीएन-वागळेवरचा आजचा सवालही आमच्या रडारवर घेऊ शकतो. परवा तर आम्ही, कोणी पाहात नाही असे पाहून, लोकमतचा अग्रलेखही वाचून काढला! (त्यात एवढे दचकायचे काय गडे? याच उत्साहाने आम्ही रा. रा. इरगोंडा पाटील यांची पुस्तकेही वाचतो म्हटले!) तर हे सांगण्याचा उद्देश इतुकाच, की तुम्हांस आमच्या दोन्ही मेंदूंच्या दणकटपणाचा अंदाज यावा! पण मित्रहो, गेल्या काही दिवसांतील विविध वृत्तपत्रांतील त्या त्या बातम्या वाचून आम्ही कमालिचे व्यथित झालो. आमचे आजारपण बळावले!

किंबहुना त्यासाठीच ही सर्व वृत्तपत्रे जाणीवपूर्वक व मुद्दामहून तशा बातम्या देत होती, असा आमचा स्पष्ट व उघड आरोप आहे.
आज काय म्हणे, या पत्रकारास पुरस्कार! उद्या काय म्हणे, त्या संपादकास पुरस्कार!...

किती किती चघळायच्या आम्ही जिलोसिलच्या गोळ्या?
किती किती वेळा प्यायचे आम्ही थंडथंड दूध?
काही लिमिट?

मुंबई मराठी पत्रकारसंघ वगैरेंचे पुरस्कार जाऊ देत. तिकडे काही आपली ओळख-पाळख नाही! पण राज्य शासन तर आमचेच ना? किंतु तिकडे पोंबुर्ल्यात दर्पण पुरस्कारांचा रमणा वाटला, तर त्यातही आमचे नाव नसावे? वृत्तपत्रांत प्रदीर्घ काळ असल्यावर हातून काही तरी लिहून होतेच ना! मग त्या निकषात आम्ही काय बसत नव्हतो का? बरे नसेल लिहिले आम्ही काही! नसेल लिहिला एकही शब्द! त्याबाबतीत आम्ही चालविला असेल पुण्यनगरीचे पुण्यश्र्लोक संपादक मुरलीधरशेठ शिंगोटे यांचा वारसा! पण ज्या संपादकीय पुण्याईने त्यांस बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार मिळाला, तेवढीही पुण्याई आमच्या गाठी असू नये? हाय हाय!! तिकडे दिल्लीत बघा. पाहा, सुरेखा टाकसाळबाईंना नोकरीत इतका काळ घालून निवृत्त झाल्यावर मिळालाच ना रु. १०,००० चा (अक्षरी दहा हजार फक्त) पुरस्कार!

तुम्हांस सांगतो, आता आम्ही तंतोतंत निर्धारच केला आहे. शेंडी तुटो वा पारंबी, पण आमच्या भिंतीवरल्या फळीवर पुरस्काराचा पेला आलाच पाहिजे. आमच्या ट्रंकेत पुरस्काराची शाल पडलीच पाहिजे. पुरस्काराच्या नारळाचे खोबरे आमच्या दाती अडकलेच पाहिजे. (त्यासाठी काय दोन-अडिचशे रुपये खर्च आला तरी बेहत्तर!)

या एवढ्या आजारातून आम्ही खडखडीत बरे झालो, की त्याच मोहिमेवर निघणार आहोत.
जरा त्या तालुका पत्रकारसंघांचे पत्ते आम्हाला कोणी देईल काय?
पत्रलेखकसंघांचे असले तरी चालतील.
राव, तेवढे कराच तुम्ही आमच्यासाठी...

(Posted by बापू आत्रंगे, दि. १३ जाने. २००९)

This entry was posted on 13.1.09 at 11:48 . You can follow any responses to this entry through the comments feed .

10 comments

EK PURASKAR PRAPTA  

DHAMAAL!

WELCOME BACK BAAPU!

TUMACHE PARATUN YENE FAAR AVADALE.

AMHA UBHYATANNA NUKATECH PURASKAR

MILALE ASALYANE AMHEE TURTA ANANDAT

AHOT...TUMHALA KALAVOO PATTE...

January 13, 2009 2:21 PM
एक पत्रकार  

बापू तुमचे अभिनंदन.. पुस्करा मिळाला म्हणून नाही, तर आजारातून खडखडीत बरे झाल्याबद्दल अन आजारपणाचा स्वतःवर (पक्षी मेंदूवर) काहीही परिणाम न झाल्याबद्दल. (काही आजारांमध्ये मेंदूपयर्ंत ताप जातो म्हणतात)
बाकी तुम्हाला पुरस्कार हवा असले तर नगर जिल्ह्यात जाऊन या. तेथे शेकडो पुरस्कार मिळतात. जरा खिसा रिकामा केला नाहीतर काैतुकाच्या बातम्या छापल्या की मिळालाच पुरस्कार. सध्या त्या जिल्ह्यातील काही पत्रकार फक्त पुरस्कार घेण्याचेच काम करतात म्हणे. बघा जमलं तर. पण तुम्हाला त्यासाठी तेथे जाऊन एखादे साप्ताहिक काढावे लागले. तेथील श्रीरामपुरात तर दीडशे साप्ताहिके निघतात म्हणे. रजिष्टेशन कितीचे ते कदाचित नोंदणी खात्याही माहिती नसावी. असं म्णतात की समोर चार-पाच माणसे चालल असली अन पाठीमागून अो पत्रकार अशी हाक मारली तर त्यातली किमान तिघे तरी मागे वळून पहातात. शिवाय त्यातील दोघे पुरस्कार विजेते असता. ते पुर,स,्कारही काही गल्लीबोळातील नाहीत बरका. तर राज्यस्तरीय व एकमेव असतात. संस्था गल्लीतील असली म्हणून काय झालं. बघा बापू या जाऊन तिकडं.

एक पत्रकार
सा. पुरस्कार

January 13, 2009 2:23 PM
पी.वार्ताहर  

प्रिय बापू, सर्वप्रथम आजारातून उठल्याबद्दल अभिनन्दन...
पुरस्कार मिळवण्याच्या तुमच्या सन्कल्पामुळे अस्मादिकही एक पुस्ताक्म लिहीण्याच्या विचारात आहेत.. शीर्षक आहे - '(घरबसल्या ) पुरस्कार कसे मिळवावेत?'
लेखक - स्तुती पाठक

'पुरस्कार मिळवलेले लोक कर्तृत्ववान नसतात, तर ते फक्त नसलेले 'कर्तृत्व' दाखवतात' - - शिव वेडा
(उपरोक्त विधान कॉपीराईट आहे)

January 13, 2009 3:44 PM
Anonymous  

बापू, तुमच्या घरी दर वर्षी एलायसीची तुमचं नाव छापलेली डायरी येते?
असेल, तर तुम्ही सीनियर पत्रकार आहात. मग किमानपक्षी तुम्हाला वृत्तपत्र लेखकांच्या (म्हणजे वृत्तपत्रात पत्रलेखन करणाऱ्यांच्या) संघाचा सर्वोत्कृष्ठ बातमीदाराचा पुरस्कार मिळायलाच हवा असे आमचे मत आहे. एक सुचवू, तुमच्या बातमीदार, सहयोगी बातमीदार किंवा कळते समजते मध्ये शिंदेवाडीतल्या सामाजिक कार्यकर्त्यांची मुलाखत का छापत नाही? अशा पत्रकारितेमुळे तेवढीच पुरस्कारासाठीची गुणवत्ता वाढते. अर्थात हा सल्ला आम्ही तुम्हाला देणे योग्य नाही. तुम्ही जाणकार आहात. दोनअडीचशे खर्चदेखील करायची तयारी आहे म्हणालात, म्हणून आपलं सुचवलं. पत्रकार संघात तुमची ओळखबिळख नाही, हे जर खरे असेल, तर तुम्हाला पत्रकार परिषदेचा पुरस्कार मिळू शकतो. बघा बुवा!
- Banyaa

January 13, 2009 5:10 PM
kallu kolhapure  

bapu thumhala aslya falty puraskarachi kay garaj. thumhala tar amachyasarkhya lakho vachkanchyakadun kadhi manoman purskar jahir zalay. to sarvat mottha.....

January 13, 2009 5:55 PM
Anonymous  

Navi Mumbait konitari Jagdale ahe. To 500 rupayat, samajbhushan, samajratna, patrakarbhushan etc purskar deto tohi mothya mansachya haste.

January 13, 2009 6:05 PM
Anonymous  

Bapu, te Padhye, Kane, bedkihan vagaire kon patrakaritetil thor mandali ahet ? tyanche nav-patte jan hitarth prasiddha kara. Hichb thor mandali Balshastrinchya navane moth mothya sampadakana vethis dhartat. Ek motha sampadak dharaycha aani baki aaplya baithakitle lunge-sunge paawan karun takayche. Kharetar Ya bogus patrakaranchi mahiti ATS kade dyayala pahije

January 13, 2009 7:18 PM
Anonymous  

सुहानं, सुहानं, वाटलं बरंका बापू तुमच्या येण्याने.

(त्यातलं हा काढून) सुनं सुनं झालेलं आमचं वाचणं. अरुंधती मौसी, पुण्यात पत्रकारितेच्या विद्यार्थांना लेलेंचा इतिहास शिकवितात तसंच इथेभी त्यांनी केलेलं. नाही म्हणता चांगदेवांची गाडी चांगली चालली. पण सकाळ आणि लोकसत्ताच्या बातम्यांची तुलना म्हणजे वेंकटपथी राजू आणि मॅथ्यू हेडन यांच्या फलंदाजीबद्दलचं बोलणं, हे काय खुद्द सकाळमधील लेखक/वाचक/पेजमेकर संपादक/वरिष्ठ संपादकांना माहिती नाही का,. त्यामुळे त्यातही फार नवं नवं नव्हतं.

तरी त्यांची शब्दांची गाडी आम्ही मोठ्या मनाने आमच्या मनात गिळली.

आता मध्येच असे आजारी पडण्याइतपत पुरणपोळ्या खावू नका.

सुहानं वातावरण कायम ठेवा.

-चक्रसोड स्वामी
(अँडलेड, आँस्ट्रेलियातून)

January 14, 2009 12:40 AM
Anonymous  

बापू, यवढं समद्यांस्नी तुमी उपदेशाचं डोस पाजताय. कवातरी त्या चॅनेलातल्या लोकास्नी कायतरी अक्कल शिकवा की. हाफिसातली पत्रकार मंडळी (ज्युनिअर) म्हंजी मुकी बिचारी कुनीबी हाका, आशी त्यांची गत झालीया. त्यांना कुत्र्यावानी वागवतात त्यांची सिनियर मंडळी. तवा त्यांनाबी कायतरी सांगा की राव

द. ग. डे

January 14, 2009 9:58 AM

मित्रहो, ज्यांस योग्य पद्धतीने पुरस्कार मिळाले आहेत, त्या समस्त पत्रकारांप्रती आमच्या मनी आदरच आहे. आम्हांस येवढेच म्हणावयाचे आहे, की आजकाल पुरस्कारांचे पावित्र्य कल्हई उडावी तसे उडत चालल्याचे प्रत्यही दिसते. हे सगळ्याच क्षेत्रात घडते आहे. पत्रकार म्हणून त्याविरोधात आपण बोलतो. पण आपल्या पायतळीचा अंधार कोण पाहणार?

रा. रा. बन्या, कल्लू, चक्रसोड, पुरस्कार प्राप्त, एक पत्रकार आणि अन्य अनामवीर यांस, प्रतिसादाबद्दल मनापासून थ्यांक्यू.

आपल्या नगर जिल्ह्यातील अनाममित्राने कॉमेन्टद्वारे दिलेली माहिती थक्क करणारी आहे...

January 14, 2009 1:06 PM

Post a Comment